नवी दिल्ली – जपानमध्ये पुढील वर्षी होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकला पात्र होण्याचा निर्धार भारताची अव्वल धावपटू श्रावणी नंदा हिने व्यक्त केला आहे.
करोनामुळे गेल्या 5 महिन्यांत होणाऱ्या अनेक पात्रता स्पर्धा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे थोडी निराश झाले होते. मात्र, येत्या काळात युरोप, अमेरिका व जपानमध्येही काही पात्रता स्पर्धा होत असून त्यात 100 व 200 मीटर अंतराच्या स्पर्धेत वेस्ट इंडिजमधील स्पर्धेपेक्षाही जास्त सरस वेळ देण्यासाठी सज्ज आहे. सध्या करोनामुळे सांघिक सरावावर बंधने असली तरीही वैयक्तिक सराव सुरू केला आहे. त्यामुळे प्रत्येक सराव शर्यतीत माझे प्रशिक्षक वेळ घेतात व त्यातून मला आणखी किती वेग वाढवायचा ते समजते. दिवाळीनंतर होत असलेल्या पात्रता स्पर्धांमध्ये सहभागी होत अव्वल कामगिरी करून टोकियो स्पर्धेला निश्चितच पात्र ठरेन, असा विश्वासही तिने व्यक्त केला.
करोनाचा धोका वाढल्यानंतर जगभरातील स्पर्धा ठप्प झाल्या होत्या. त्यावेळी वेस्ट इंडिजमध्ये मात्र, करोनाचा धोका फारसा नसल्याने काही निमंत्रित स्पर्धा खेळविण्यात आल्या. त्यात जगभरातील धावपटू सहभागी झाले होते. त्यात भारताच्या श्रावणीनेही सहभाग घेतला होता. करोनाच्या सावटात परदेशी स्पर्धांमध्ये सहभागी होणारी श्रावणी भारताची एकमेव खेळाडू ठरली आहे. किंग्जस्टन जमैकामध्ये झालेल्या वेलॉसिटी फेस्ट रन या स्पर्धेत तिने सहभाग घेतला होता.
तिने 100 मीटर अंतराच्या शर्यतीत 11.78 सेकंद अशी वेळ नोंदवली होती. मात्र, टोकियो ऑलिम्पिकला पात्र होण्यासाठी तिला आणखी सरस वेळ द्यावी लागणार आहे. ऑलिम्पिक पात्रतेसाठी जे निकष ठेवण्यात आले आहेत त्यात 100 मीटरसाठी 11.15 सेकंद तर 200 मीटर शर्यतीसाठी 22.80 सेकंदाचा मार्क ठेवला आहे. या दोन्ही वेळा व श्रावणीने नोंदवलेली वेळ यांत खूप तफावत असून तिला जर पात्र व्हायचे असेल तर जवळपास 1 मिनिटांचे अंतर भरून काढण्यासाठी आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. तिने आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत 4 बाय 400 मीटर अंतराच्या शर्यतीत ब्रॉंझपदकाची कमाई केली होती. ही कामगिरी तीन वर्षांपूर्वी तिने
केली होती.
मात्र, त्यानंतर भारताच्या मैदानी स्पर्धेच्या संघात तिला स्थान राखता आलेले नव्हते. त्यामुळे आता वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या स्पर्धेनंतर पुढील काळात होत असलेल्या पात्रता स्पर्धांमध्ये तिला सरस वेळ द्यावी लागेल. त्यासाठी आशियाई विजेतेपद तसेच जागतिक विजेतेपद स्पर्धांमध्ये तिला सहभागाची संधी असून त्यात तिने निकष पूर्ण केले तर ती टोकियो स्पर्धेला पात्र होणार आहे.
रिओतील अपयश पुसून काढणार
2016 साली रिओ ऑलिम्पिकला पात्र ठरले होते. मात्र, 100 मीटर अंतराच्या शर्यतीत मला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी झालेल्या शर्यतीत मला 11.45 सेकंद अशी वेळ देण्यात यश आले होते. मात्र, ती पदक जिंकून देण्यात अपुरी ठरली. त्यामुळे जे पदक रिओमध्ये मिळाले नाही ते टोकियोत मिळवणार, असा निर्धारही तिने व्यक्त केला.