टोकियो – भालाफेक प्रकारात भारताचा अव्वल खेळाडू नीरज चोप्रा याने पदक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. नीरज ऑलिम्पिक पथकासह टोकियोत दाखल झाला असून तीन दिवसांच्या विलगीकरणानंतर त्याने सरावही सुरू केला आहे.
ऑलिम्पिक स्पर्धा गेल्या वर्षी करोनाच्या धोक्यामुळे पुढे गेली ते एक प्रकारे चांगले झाले. कारण त्यापूर्वीच्या विविध स्पर्धांमध्ये खेळायला मिळाले व ऑलिम्पिकपूर्वी चांगला सरावही मिळाला, आता टोकियोतही अत्याधुनिक सुविधांसह सराव सुरू असून प्रत्यक्ष स्पर्धेत पदक जिंकूनच मायदेशी परतणार, असा विश्वासही नीरजने व्यक्त केला.
यंदा जपानमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे 100 पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होत आहेत. इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय खेळाडू स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदक संख्येत वाढ होईल अशी अपेक्षा केली जात आहे. 2016 साली झालेल्या जागतिक ज्युनिअर स्पर्धेत नीरजने भालाफेकीत 84.48 मीटर अंतर नोंदवत केलेला विश्वविक्रम अद्यापही अबाधित आहे. त्याने हा विश्वविक्रम रिओ ऑलिम्पिक पात्रता फेरीतील अखेरच्या दिवशी केला होता. मात्र, पात्रता निकष त्यापेक्षा जास्त असल्याने तेव्हा तो पात्र होऊ शकला नाही.
या लक्षवेधी कामगिरीनंतर भारतीय सेनादलाने त्याला आपल्या सेवेत सामावून घेताना नायब सुभेदार पदावर नियुक्त केले होते. 2018 साली त्याने आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. 2018 साली जकार्तातील आशियाई स्पर्धेत तसेच गोल्डकोस्टमधील 2017 सालच्या आशियाई स्पर्धेत आणि 2016 सालच्या दक्षिण आशियाई तसेच जागतिक ज्युनिअर स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले होते.