कोलकाता -पश्चिम बंगालचे क्रीडा राज्यमंत्री आणि क्रिकेटपटू मनोज तिवारी यांची आगामी मोसमात होत असलेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या संभाव्य संघात निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली असून जर राज्यासाठी एक क्रीडापटू म्हणून योगदान देण्याची इच्छा असेल तर जरूर खेळ, अशा शब्दांत बॅनर्जी यांनी परवानगी दिल्याची माहितीही तिवारी यांनी दिली आहे.
बंगाल क्रिकेट संघटनेने आगामी मोसमातील रणजी तसेच अन्य प्रथम दर्जाच्या स्पर्धांसाठी संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केली असून त्यात ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये क्रीडामंत्री असलेल्या मनोज तिवारी याचाही समावेश करण्यात आला आहे.
तिवारी यांनी रणजी करंडक, विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी निवड केल्याबद्दल समाधानी असून मला या स्पर्धांमध्ये खेळण्याची इच्छा असल्याचेही तिवारी यांनी सांगितले. बंगाल संघाचे तंदुरुस्ती शिबिर येत्या शुक्रवारपासून सुरू होत आहे.
तिवारी यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसकडून निवडणूक लढवली व विजयही मिळवला होता. त्यांचा समावेश ममता बॅनर्जी यांनी आपल्या मंत्रिमंडळात क्रीडामंत्री म्हणून केला होता. मात्र, एक खेळाडू असल्याने त्यांना प्रत्यक्ष मैदानात कामगिरी करण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळेच त्यांनी पुन्हा खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती व त्यानुसारच त्यांची संभाव्य संघात निवड झाली आहे.