नवी दिल्ली: करोनामुळे सारी विमान सेवा ठप्प आहे. ही विमान सेवा जून महिन्यापर्यंत ठप्प राहिली तर भारतीय विमान क्षेत्राचे तब्बल 3 ते 3.60 अब्ज डॉलर्सचे नुकसान होण्याची शक्यता आहे असा अंदाज विमान वाहतूक क्षेत्राशी संबंधित असलेल्या सीएपीए या संस्थेने आज आपल्या रिपोर्टमध्ये व्यक्त केला आहे. भारत सरकारने येत्या 15 एप्रिल पर्यंत सारी विमान सेवा बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. यात विमान कंपन्यांचे नुकसान अंदाजे 1.75 अब्ज डॉलर्स इतके असेल तर विमान तळ आणि अन्य संबंधित विभागाचे नुकसान दीड ते पावणे दोन अब्ज डॉलर्स इतके असणार आहे.
विमानतळावर जी सेवा दिली जाते त्या क्षेत्राचे 80 ते 90 दशलक्ष डॉलर्स इतके नुकसान होईल, असेही यात नमूद करण्यात आले आहे. हा सगळा तोटा भारतीय चलनामध्ये 25 ते 27 हजार कोटी रुपये इतका असेल.देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा 30 जूनपर्यंत बंद राहिली तरचा हा अंदाज आहे असे या रिपोर्ट मध्ये नमूद करण्यात आले आहे. भारताचे नवीन आर्थिक वर्ष एप्रिल मध्ये सुरू होते व एप्रिल ते जून ही या आर्थिक वर्षातील पहिली तिमाही समजली जाते. या तिमाहितच विमान कंपन्यांचा चांगला व्यवसाय नोंदवला जातो.
हा विमान वाहतूक बंदचा धक्का सहन करण्याची क्षमता भारतीय विमान कंपन्यांची नाही. त्यांना इंधन दरातील वाढ, मंदी असे आर्थिक क्षेत्रातील नियमीत धक्के कसे हाताळायचे याचेही कौशल्य नसते आता तब्बल तीन आठवडे पूर्ण विमान सेवाच बंद करावी लागत असल्याने यातून होणाऱ्या नुकसानीतून या विमान कंपन्या कसा मार्ग काढणार याची मोठीच चिंता आहे.