नवी दिल्ली – मालदीवमध्ये अनेक वर्षे रहात असलेले आणि नव्याने भेट दिलेल्या भारतीयांचे म्हणणे आहे की, ते आता पुढच्या वेळी लक्षद्वीपला भेट देतील. मालदीवच्या तीन मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताविरोधात केलेल्या अपमानजनक टिप्पणीनंतर अनेक भारतीय सेलिब्रिटींसह भारतातील लोकांनी मालदीववर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे.
मालदीव या पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था असलेल्या देशाला भेट देत असलेल्या पर्यटकांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक असते. अशा प्रकारे भारत हा मालदीवसाठी सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत आहे. मात्र, पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपमध्ये पर्यटनाला प्रोत्साहन दिल्याने अनेक लोक मालदीवऐवजी लक्षद्वीपला जाण्याचा विचार करत आहेत. त्याचबरोबर मालदीवमध्ये स्थायिक असलेल्या भारतीयांच्या मनात लक्षद्वीपला भेट देण्याची इच्छाही जागृत होऊ लागली आहे.
डेहराडूनचे डीके अग्रवाल सांगतात की, आम्ही वादाच्या आधीच मालदीवला भेट देण्याची योजना आखली होती. भारतीय लोक हे मालदीवच्या उत्पन्नाचे सर्वात मोठे स्त्रोत असताना किमान तेथील नेत्यांनी भारतीय पंतप्रधानांबद्दल अपमानास्पद बोलू नये. लवकरच या वादाचा परिणाम मालदीववर दिसून येईल. आम्हीही आता लक्षद्वीपला जाण्याचे नियोजन करत आहोत.
मालदीवला भेट देण्यासाठी आलेला भारतीय पर्यटक कुणाल सोमय्या म्हणतो की पंतप्रधान मोदी भारतीय पर्यटनाला चालना देत आहेत. भारतासाठी ही सकारात्मक बाब आहे. त्यामुळे भारतीय पर्यटन स्थळांबद्दल उत्सुकता वाढेल. लक्षद्वीप हा नेहमीच भारताचा भाग राहिला आहे, लोकांना त्याबद्दल माहिती आहे, पण जेव्हापासून पंतप्रधान तेथे गेले आणि त्यांनी ज्या रंजक आणि सकारात्मक पद्धतीने तेथील सौंदर्य सादर केले, त्यामुळे लाखो लोकांच्या मनात लक्षद्वीपबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. .