Nagarjuna : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच लक्षद्वीपला भेट दिली होती. या भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. यावरुन मालदीव आणि लक्षद्वीपची तुलना सुरू झाली. यानंतर पीएम मोदींनी देशवासियांना देखील लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले. याची आता मालदीव सरकारला काळजी वाटू लागली.
त्यानंतर मालदीवमधील मंत्री आणि नेत्यांनी पीएम मोदींवर टीका करण्यास सुरूवात केली होती. प्रकरणाबाबत मालदीवच्या एका मंत्र्याने केलेल्या पोस्टवरून वाद निर्माण झाला. त्यानंतर रियम शिउना, मलशा शरीफ आणि अब्दुल्ला महजूम मजीद या तीन मंत्र्यांना त्यांच्या पदावरून देखील हटवण्यात आलं आहे.
दरम्यान, या मुद्द्यावरून दोन्ही देशांचे युजर्स सोशल मीडियावर आपसात भिडले आहेत. सलमान खान, अक्षय कुमार, जॉन अब्राहम, सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गजांनी मालदीवला खडेबोल सुनावल्यानंतर आता तेलगू चित्रपटसृष्टीमधील दक्षिणेतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेल्या नागार्जुन यांनी आपला मालदीवचा दौरा रद्द केला आहे. इतकेच नाही तर त्यांनी मोदींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांचाही समाचार घेतला आहे. प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया उमटणारच असं नागार्जून यांनी म्हटलं आहे.
या विषयी बोलताना नागार्जून म्हणाला की, “मी ‘बिग बॉस’ तसेच ‘ना सामी रंगा’ साठी कोणताही ब्रेक न घेता सलग 75 दिवस काम करत आहे. सध्या मी माझे तिकीट कॅन्सल केले आहेत. मी पुढल्या आठवड्यात लक्षद्वीप जाण्याचा विचार करतोय. मी हा निर्णय कोणाला घाबरुन घेतलेला नाही. मला सध्याचं वातावरण योग्य वाटलं नाही म्हणून मी तिकीट रद्द केलं आहे,” असं सांगितलं.
ते पुढे म्हणाले, ‘त्यांनी जे काही म्हटलं तसेच ते जे काही बोलले ते फार चांगलं नव्हतं. ते आमचे पंतप्रधान असून त्यांच्याबद्दल अशी विधानं करणं योग्य नाही. ते 150 कोटी लोकांचं नेतृत्व करतात. मालदीवच्या मंत्र्यांनी ज्या पद्धतीची वर्तवणूक केली ती योग्य नाही. ते याचेच परिणाम भोगत आहेत. प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया येत असते,” असा खोचक टोला नागार्जून यांनी यावेळी लगावला.