सॅन फ्रान्सिस्को, – खलिस्तानींनी सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय दूतावासावर केलेल्या हल्ल्यानंतर भारताला समर्थन देण्यासाठी तेथील मूळ भारतीयांच्या गटाने दूतावासाबाहेर एका रॅलीचे आयोजन केले होते. खलिस्तानवाद्यांनी भारतीय दूतावासाची जाळपोळ करण्याचा प्रयत्न केल्याचे एक व्हिडीओ 2 जुलै रोजी सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला होता. सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावासावर अलिकडच्या काळात खलिस्तानवाद्यांनी केलेला हा दुसरा हल्ला होता.
खलिस्तान समर्थक निदर्शकांच्या गटाने 19 मार्च रोजी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला करून नुकसान केले होते. दूतावासासमोरील तिरंगा उतरण्याचा प्रयत्नही खलिस्तानवाद्यांनी केला होता. भारताच्या निषेधाच्या आणि खलिस्तानवादी गोषणाही यावेळी देण्यात आल्या होत्या.
भारताच्या समर्थनासाठी सॅन फ्रान्सिस्को येथील दूतावासाबाहेर झालेल्या रॅलीच्यावेळी मोठ्या संख्येने मूळ भारतीय लोक जमा झाले होते. खलिस्तानवाद्यांच्या हिंसक आंदोलनाच्या तुलनेत ही रॅली शांततामय मार्गाने पार पडली.
खलिस्तानवाद्यांचा हल्ला म्हणजे दहशतवादी हल्ला होता, असे फलक यावेळी दर्शवण्यात आले. या हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना शिक्षा व्हायला हवी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी गुरुवारी सॅन फ्रान्सिस्कोतील दूतावासाला भेट दिली आणि दूतावासातील भारतीय दूत आणि कर्मचाऱ्यांची भेट घेतली होती. भारताने कट्टरवादी खलिस्तानवाद्यांच्या कारवायांना आपल्या देशात स्थान देऊ नये, अशी विनंती भारताने कॅनडा, अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाला केली आहे.