नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्यातील लष्करामध्ये गेल्या आठवड्यात उत्तर सिक्कीम मधील नथुला पास परिसरात चांगलाच संघर्ष उडाला होता असे वृत्त आहे. त्या भागातून चीनी सैन्याने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला पण त्यांना भारतीय सैन्याने तेथेच रोखले. त्यावेळी चिनी लष्कराने आक्रमक भूमिका घेत भारतीय जवानांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय सैन्याने त्यांना तेथून पिटाळण्यात यश मिळवले आहे असे सांगण्यात येते.
नथुला या भागातच गेल्यावर्षी 9 मे रोजी दोन्ही सैन्यांमध्ये मोठा संघर्ष झाला होता. तथापि या भागात नव्याने झालेल्या संघर्षाच्या संबंधात भारत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भारत आणि चीन यांच्यात पुर्व लडाख मध्ये निर्माण झालेली तणावाची स्थिती आज नऊ महिन्यानंतरही तशीच आहे.
त्यातच आता सिक्कीमच्या भागातही दोन्ही सैन्यात संघर्ष उद्भवल्याने या संघर्षाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याचे दिसून येत आहे.अलिकडेच चीनने अरूणाचल प्रदेशाच्या हद्दीत घुसून एक स्वतंत्र गावच भारतीय हद्दीत स्थापन केल्याचे दिसून आले आहे.