दुबई – सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतावर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. तर पहिल्याच सामन्यात पराभव झाल्याने स्पर्धेत भारताची सुरुवात निराशाजनक झाली.
नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 151 धावा केल्या. प्रत्युत्तर फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानने 17.5 षटकांत 152 धावा करून विजयाची नोंद केली.
विजयासाठी 152 धावांच आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानने सावध सुरुवात केली. रिझवान आणि आझम यांनी 17.5 षटकांत चेंडूंत 152 धावांची अभेद्य भागीदारी रचत पाकिस्तानचा विजय साकार केला. रिझवानने 55 चेंडूंत 6 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 79 धावा केल्या. तर बाबर आझमने 52 चेंडूंत 6 चौकार आणि 2 षटकारासह नाबाद 68 धावा केल्या.
तत्पूर्वी, कर्णधार विराट कोहलीचं शानदार अर्धशतक आणि ऋषभ पंतने फटकावलेल्या 39 धावांच्या जोरावर भारतीय संघाने टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान समोर विजयासाठी 152 धावांचं लक्ष्य ठेवलं. सुरुवातीला पाकिस्तानच्या गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारतीय संघाला पहिल्याच षटकात रोहित शर्माच्या रूपाने पहिला धक्का दिला, रोहितला भोपळाही फोडता आला नाही. त्यापाठोपाठ लोकेश राहुल देखील 3 धावा करून बाद झाला. दोघांना शाहीन आफ्रिदीने बाद केलं.
दरम्यान सूर्यकुमार यादवने विराट कोहलीसोबत मिळून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र सूर्यकुमार यादव (11) हसन अलीच्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतने कोहलीच्या साथीत शानदार फटकेबाजी करत भारताची धावसंख्या वाढवली. कोहली आणि पंतने चौथ्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी रचली. मात्र शादाब खानच्या चेंडूवर रिषभ पंत बाद झाला. त्याने 30 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 39 धावा केल्या.
पंतनंतर फलंदाजीला आलेल्या रवींद्र जडेजाने कोहलीला सुरेख साथ दिली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली. अठराव्या षटकांत हसन अलीच्या चेंडूवर 13 धावा करून बाद झाला. मात्र कोहलीने 49 चेंडूंत 1 षटकांर 5 चौकारांच्या मदतीने 57 धावा केल्या. तर हार्दिक पांड्याने 11 धावा केल्या. त्यामुळे भारताला २० षटकांत 7 बाद 151 धावापर्यंत मजल मारता आली.
पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने तीन, हसन अलीने दोन आणि हॅरिस रौफने एक विकेट घेतली.