अहमदाबाद – फलंदाजी व गोलंदाजीतही अपयश आल्यामुळे तिसरा टी-20 सामना गमावलेल्या भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात विजय मिळवण्याची नितांत गरज आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत आजच्या सामन्यात विजय मिळवत बरोबरी केली तरच अखेरच्या पाचव्या सामन्यातील विजयासह मालिका जिंकण्याची आशा निर्माण होणार आहे. त्यासाठी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघासाठी आजचा सामना “करो या मरो’, अशा स्थितीत आहे.
त्यातच कोहलीला विश्रांती दिली जाण्याची शक्यताही बोलली जात असल्याने संघाची फलंदाजी देखील दुबळी होणार आहे. जर कोहलीला खरेच विश्रांती दिली तर रोहितकडे नेतृत्व सोपवले जाईल व अशा स्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी नवोदितांपैकी सूर्यकुमार यादवचा पर्यायही निवड समितीला वापरून पाहावा लागणार आहे.
सूर्यकुमारला दुसऱ्या सामन्यात पदार्पणाची संधी दिली व फलंदाजी देखील त्याला मिळाली नाही. मात्र, लगेचच तिसऱ्या सामन्यात त्याला संघातून वगळले व रोहित शर्माला टी-20 संघात पुनरागमनाची संधी दिली गेली. सलामीवीर लोकेश राहुल भरात नसतानाही त्याला खेळवण्याचा अट्टहास कोहलीने केला.
या सामन्यात विजय मिळवत आघाडी घेण्याची संधी भारतीय संघाने गमावली. संघातील प्रमुख फलंदाज पाठोपाठ बाद होत गेले व कोहलीच्या दमदार खेळीमुळे संघाला समाधानकारक धावसंख्या उभारण्यात यश आले. मात्र, आता जर कोहलीलाच विश्रांती दिली गेली तर भारतीय फलंदाजी आणखी कमकुवत बनणार आहे. अशा स्थितीत इशान किशन व रोहित शर्मा यांच्यासह ऋषभ पंतवरच फलंदाजीचा संपूर्ण भार येणार आहे.
पहिला सामना इंग्लंडने जिंकला तर, दुसरा सामना जिंकत भारतीय संघाने मालिकेत बरोबरी केली. त्यानंतर पुन्हा तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. आता चौथा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्यासाठी भारतीय संघाला तर, याच सामन्यातील विजयासह मालिका जिंकण्यासाठी इंग्लंडला अत्यंत सरस कामगिरी करावी लागमार आहे.
हा सामना गमावला तर भारतीय संघ मायदेशात पहिल्यांदाच इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका गमावेल. विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत बरोबरी करण्यासाठी भारत व इंग्लंड या दोन्ही संघात चांगलीच चुरस रंगण्याची अपेक्षा आहे. झालेल्या चुका विसरून भारतीय संघाची कामगिरी दर्जाला साजेशी होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरने तर, दुसऱ्या सामन्यात किशन व कोहली खेळले म्हणून विजय सोपा झाला; पण तरीही गेल्या अनेक महिन्यांपासून मर्यादित षटकांच्या सामन्यात आपल्याला दमदार सलामी मिळालेली नाही.
दुसऱ्या सामन्यात 73 तर, तिसऱ्या सामन्यात नाबाद 77 धावांची खेळी करत कोहलीने आपण भरात आल्याचेही सिद्ध केले मात्र, त्याला समोरून योग्य साथ मिळत नसल्याने भारतीय संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आलेली नाही.
भुवनेश्वर कुमार पूर्ण तंदुरुस्त होऊन सहभागी झाल्याने संघाला दिलासा मिळाला असला तरीही शार्दुल ठाकूर व हार्दिक पंड्या यांच्याकडून असलेल्या अपेक्षा पहिल्या तीनही सामन्यांत पूर्ण झालेल्या नाहीत. तिसऱ्या सामन्यातही पंड्याला आक्रमक फलंदाजीत सातत्य राखता आलेले नाही. त्याने केलेली संथ फलंदाजीच भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. कोहली भरात आला हे संघासाठी अत्यंत महत्वाचे आहे. तरीही सलामीला लोकेश राहुलच्या जागी रोहितच सलामी करेल अशा स्थितीत सूर्यकुमार यादवला चौथ्या सामन्यात तरी पुन्हा संधी मिळणार का हा मोठा प्रश्न आहे.
इंग्लंडचा संघ संतुलीत असून कर्णधार इयान मॉर्गन, बेन स्टोक्स व जोस बटलर यांना रोखण्याचेच आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर आहे. डेव्हिड मलान, जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो यांच्यासह सॅम व टॉम कुरेन यांनाही चमक दाखवल्यामुळे या सामन्यातही त्यांचीच बाजू वरचढ राहणार आहे. केवळ हाच सामना नव्हे तर, ही मालिकाही जिंकायची असेल तर भारताला किमान 180 ते 200 धावा करणे आवश्यक आहे.
रोहित भरात येणार का?
पाच सामन्यांच्या या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांतून विश्रांती देण्यात आलेला रोहित शर्मा तिसऱ्या सामन्यात संघात परतला. मात्र, त्याला केवळ 15 धावाच करता आल्या. क्रिकेटच्या या वेगवान प्रकारात रोहित स्पेशालिस्ट समजला जातो. त्यामुळे त्याच्या बॅटमधून धावा निघणे भारतीय संघासाठी अत्यंत महत्वाचे राहणार आहे. आता या करो या मरो लढतीत तरी रोहित आपल्या भरात येणार का याचीच उत्सुकता आहे. नेटमध्ये सराव करताना तो चेंडू मिडल करत आहे मात्र, आता प्रत्यक्ष सामन्यातही त्याची चमक दिसली पाहिले हीच अपेक्षा चाहते करत आहेत.