-अमित डोंगरे
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ज्या पद्धतीने चुकीचा कॉल दिला तो पाहता ऋषभ पंतच्या धावबाद होण्याला कोहलीने पंतचा बळी दिला, असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल.
भारतीय संघ ज्या सामन्यात अपयशी कामगिरी करतो त्यात अपयशाच्या सर्व मर्यादाही पार करतो. मंगळवारी इंग्लंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात मुळातच तीऩ गडी बाद झालेले असताना आणि कोहली पंतसह सुरेख खेळत असताना ही दुर्बुद्धी का सुचली हे देखील न उलगडणारे कोडे आहे.
सलामीवीर लोकेश राहुलने पुन्हा एकदा निराशा केली. संघात गेल्याच सामन्यात पदार्पण केलेल्या इशान किशन पुन्हा एकदा शॉट सिलेक्शनमध्ये चुकला. टी-20 संघात पुनरागमन केलेल्या हिटमॅऩ रोहित शर्माने पहिल्या काही फटक्यांनी आशा दाखवली होती. मात्र, त्यानेही अनावश्यक पूल खेळण्याचा प्रयत्न केला आणि संघाला आणखी खाईत लोटले.
यावेळी भारतीय संघाच्या धावफलकाने धावांची जेमतेम तिशी पार केली होती. त्यानंतर भरात आलेला कोहली व मुळातच आश्वासक होत असलेला पंत खेळपट्टीवर एकत्र आले. त्यांनी एकेरी व दुहेरी धावांबरोबरच मोठे फटके मारण्याची एकही संधी सोडली नाही. हे दोघ सेट झाल्यानंतरही षटकामागे केवळ 5 ते 7 ची धावगती होती. त्याचवेळी कोहलीसह पंतनेही फलंदाजीचा गिअर बदलला व आक्रमकतेची कास धरली. मात्र, बेलगाम किंवा बेदरकार वृत्तीला कधी खिळ बसेल हे सांगता येत नाही आणि तेच घडले.
आत्महत्या कोणत्या प्रकारे करावी याला काही नियम नाहीत व क्रिकेटमध्ये मिस फिल्डवर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आत्महत्याच असते असेही बोलले जाते. त्याचाच प्रत्यय तिसऱ्या सामन्यात आला. पंतने टोलवलेला चेंडू क्षेत्ररक्षकाने अडवताना मिस फिल्ड झाले व गरज नसताना व एकेरी धावच नसतानाही कोहलीने पंतला चुकीचा कॉल दिला. यावेळी कोहली सेफ क्रीझमध्ये धावणार होता; पण पंत धोका पत्करून व कर्णधाराच्या कॉलला कसे नाही म्हणायचे याचा विचार करत धावला. अर्थातच ती धावच नव्हती व यष्टीरक्षक जोस बटलरने नॉन स्ट्राइकर एंडला चेंडू फेकला व गोलंदाज सॅम कुरेन याने कोणतीही चूक न करता पंतला धावबाद केले.
कोणताही क्रिकेटपटू जेव्हा आपल्या लहान वयात क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात करतो त्यावेळी कोणत्याही स्तरावरचा प्रशिक्षक असो तो नेहमी सांगतो की, मिस फिल्डवर धाव घेण्याचा धोका पत्करू नये. आता ही शिकवण कोहली किंवा पंतला मिळाली नसेल का. गेल्या लेखात आपण म्हटले होते की, फलंदाजांचे शॉट सिलेक्शन चुकले आता या लेखात आपण त्यांच्या धावा घेण्याच्या तंत्रावर तसेच चुकांवर बोलत आहोत. म्हणजेच आता आंतरराष्ष्ट्रीय स्तरावर प्रचंड सामने खेळल्यानंतरही आता या फलंदाजांना चोरट्या धावा कशा घ्यायच्या हे देखील शिकवायचे का.
फार पूर्वी महान अष्टपैलु कपिल देव पहिला षटकार मैदानाच्या ज्या दीशेला मारायचे त्याच दिशेला पुन्हा षटकार मारताना बाद व्हायचे. त्यांनाही हे कळत होते पण वळत नव्हते. तोच प्रकार थोडा वेगळ्या पद्धतीने आता भारतीय फलंदाजांना कळेनासा झाला आहे का, असा प्रश्न पडतो. शॉट सिलेक्शनबाबत तर आपण वारंवार त्याच त्या चुका करत आहोत आता चोरटी धाव घेतानाही चुका करत आहोत. भारतीय संघाचे एक विशेष आहे की ते जेव्हा सुमार खेळतात तेव्हा इतक्या वाईट पद्धतीने खेळतात की त्याचे वर्णनही करणे शक्य होत नाही.
या मालिकेत आपले अनुभवी काय किंवा नवोदित काय फलंदाज अत्यंत लाजीरवाण्या पद्धतीने बाद होत आहेत. त्यामुळे आता क्रिकेटच्या पायाभूत गोष्टी देखील शिकवण्यासाठी त्यांना शिकवणी लावावी का.