नवी दिल्ली – सॅफ फुटबॉल स्पर्धेतील भारत श्रीलंका यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. या स्पर्धेतील सलामीच्या लढतीतही भारताला बांगलादेशशी 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते.
या स्पर्धेचा सात वेळचा विजेता असलेला भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत मात्र, एकही गोल करु शकला नाही. स्टार खेळाडू सुनील छेत्री याच्याकडून असलेली अपेक्षाही फोल ठरली. या सामन्यात त्याने एक गोल केला असता तर त्याने ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्या विक्रमाची बरोरी केली असती.
त्याला आता या कामगिरीसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. छेत्रीने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात एक गोल करत आपला 76 वा गोल नोंदवला होता. गुरुवार त्याला श्रीलंकेविरुद्ध गोल करत पेलेंची बरोबरी करण्याची नामी संधी होती.
मात्र, जागतिक क्रमवारीत तब्बल 205 व्या स्थानावर असलेल्या श्रीलंकेचा बचाव भारताच्या एकाही खेळाडूला भेदता आला नाही.