इस्लामाबाद- पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील काही ठिकाणांवर हल्ला करण्याची तयारी भारत करत असल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केला आहे. भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये पाकिस्तानचे दोन सैनिक मारले गेले होते. त्यानंतर गुरुवारी झालेल्या झेलम जिल्ह्यामधील एका एकत्रीकरणामध्ये बोलताना इम्रान खान यांनी ही धास्ती व्यक्त केली.
काश्मीरमधील 370 कलम रद्द करणे आणि बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद असलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे आलेली निराशा इम्रान खान यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होती. काश्मीरच्या मुद्दयापासून आणि “सीएए’ कायद्याला होत असलेल्या विरोधावरून जगाचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी मोदी पाक व्याप्त काश्मीरला लक्ष्य करतील, असे आपण गेल्या 5 महिन्यांपासून सांगत आहोत. यासंदर्भात आपण लष्कर प्रमुख जनरल कमार जावेद बाजव यांनाही याबाबत सांगितले होते. असेही इम्रान खान म्हणाले.