कॅंडी :- भारत व पाकिस्तान यांच्यातील सामना हा ऍशेस कसोटी मालिकेपेक्षाही जास्त रंगतदार असतो. या सामन्यात जी चुरस पाहायला मिळते ती ऍशेसच नव्हे तर अन्य कोणत्याही संघांच्या सामन्यात पाहायला मिळत नाही, असे वक्तव्य ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटी क्रिकेटपटू टॉम मुडी यांनी केले आहे.
भारत व पाकिस्तानचा संघ 2019 सालच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर पहिल्यांदाच आशिया करंडक स्पर्धेत आमनेसामने येत आहेत. तब्बल चार वर्षांची चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. या लढतीत केवळ मैदानात खेळत असलेल्या दोन संघातच नव्हे तर चाहत्यांमध्येही चांगलीच चुरस अनुभवायला मिळते. या सामन्यापूर्वीच तयार होत जाणारे वातावरण, प्रत्यक्ष सामन्यात होणारी कामगिरी तसेच त्यातील प्रत्येक गोष्ट टिपण्याची माध्यमांची स्पर्धा हे सगळेच अनाकलनीय आहे, असेही मुडी म्हणाले.
भारत व पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्याचे महत्त्व अन्य कोणत्याही स्पर्धेला किंवा सामन्यांत दिसत नाही. जेव्हा या दोन संघातील सामन्याचे वेळापत्रक जाहीर होते त्या दिवसापासून प्रत्यक्ष सामन्याला प्रारंभ होइपर्यंत चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो.
पाकिस्तान संघाकडे खूप प्रतिभा आहे. मात्र, भारतीय संघ त्यांना प्रत्येक विश्वकरंडक स्पर्धेत जास्त यशस्वी ठरला आहे. हे दोन्ही संघ एकमेकांशी खेळताना हा केवळ एक खेळ राहात नाही तर त्याला जणू युद्धाचे स्वरूप आल्यासारखे वाटते, असेही मुडी यांनी म्हटले आहे.
शाहीन भारतासाठी धोकादायक…
पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी नव्या चेंडूने भारतासाठी धोकादायक ठरू शकतो. 2021 सालच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत शाहीनच्याच गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर झालेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत मात्र तो साफ अपयशी ठरला होता. मात्र, आता आशिया करंडक तसेच त्यानंतर होत असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत तो भारतीय फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतो, असेही मुडी म्हणाले.