पुणे – यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्याने तर विक्रम रचलाय. 1901 नंतर पहिल्यांदाच यावर्षी ऑगस्ट महिन्यात खुप कमी पाऊस झाला आहे. जवळपास पूर्ण महिनाच कोरडा गेला. त्यामुळे राज्यातील शेतीपीके वाळून जात आहे. राज्यातील धरणांमधील पाणीसाठा तळ गाठत आहेत. चाऱ्याचा मोठा प्रश्न येत्या काळात निर्माण होणार आहे. परिणामी शेती व संलग्न क्षेत्रातील पदर्थांचे भाव हळूहळू वाढत असल्याचे चित्र आहे. शनिवारी मुंबई दूध उत्पादक संघाची बैठक झाली होती. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आजपासून (दि. 1) म्हशीच्या दुधाचे घाऊक दर प्रतिलिटर 2 रुपये वाढविण्यात आले आहेत. तर यापुढेही परिस्थिती बिकट होत गेल्यास यामध्ये अधिक वाढ होण्याची शक्याता आहे.
शनिवारी (दि. २५ आॅगस्ट) मुंबई दूध उत्पादक संघाची बैठक झाली होती. या बैठकीत सुमारे 700 दूध डेअरी मालक उपस्थित होते. या बैठकीत म्हशीच्या दूध दरांत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे दर शुक्रवारपासून म्हणजेच 1 सप्टेंबरपासून लागू करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आजपासून दुधाच्या दरात वाढ झाली आहे. या वाढीनंतर मुंबईत म्हशीच्या दुधाच्या घाऊक दरांत प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ झाल्याने किरकोळ दर 85 रुपयांवरून 87 रुपये प्रतिलिटर झाले आहे.
काही दिवसांतच जन्माष्टमी आणि गणेशोत्सव हे सण साजरे होणार आहेत. या सणासुदीकाळात मिठाई आणि दुधाचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढतो. त्यापूर्वी म्हशीच्या दुधाच्या दरांत वाढ झाल्याने त्यामुळे मिठाई आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. राज्यातील धरण पाणीसाठ्यांची स्थिती चिंताजनक असून शेतीसाठी पाणी न सोडण्याचा निर्णयही काही ठिकाणी घेण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यात आहे.