सांगली – राज्यात सध्या कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतीपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकासान होत आहे. शेती पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वाळून जात आहेत. तर दुसरीकडे लम्पी स्कीन आजाराने थैमान घातले असून जनावरे दगावत आहे. सर्वच बाजूंनी शेतकरी संकटात सापडल्याची स्थिती आहे.
सांगली जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून जनावरांना ‘लम्पी स्कीन’ आजाराची लागण होत आहे. लम्पी स्कीन हा संसर्गजन्य विषाणू आहे. जिल्ह्यात दोन महिन्यात 3601 जनावरे या आजाराने बाधित झाली असून आतापर्यंत तब्बल 233 रनावरे दगावली आहेत. दरम्यान, गो वंशीय जनावरांमधील आजाराच प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांचे शंभर टक्के लसीकरणही करण्यात आले आहे. जिल्ह्यात गाय, बैल, वासरू या गो वंशीय जनावरांची संख्या 3 लाख 24 हजार 756 इतकी आहे. गेल्या वर्षी देखील या आजाराने थैमान घातले होते.
दरम्यान, जिल्ह्यात 3601 जनावरांना रोगाची लागण झाली असून त्यापैकी 1768 जनावरे बरी झाली आहेत. 1600 जनावरांवर उपचार सुरू आहेत. तर 233 जनावरे मृत्यू पावली आहेत. लम्पीमुळे मृत्यू झालेल्या जनावरांना शासन आदेशानुसार मदत देण्यात येणार आहे. ज्या पशुपालकांची जनावरे दगावली आहेत. अशा पशुपालकांनी मदतीसाठी प्रस्ताव सादर केले आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.