सिडनी – भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु असलेली तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर भारताला पूर्णपणे नेस्तनाबूत करत, ऑस्ट्रेलियाने 51 धावांनी विजय मिळवला.
भारताकडून कर्णधार विराट कोहलीच्या 87 चेंडूंत 89 धावा (7 चौकार, 2 षटकार), के. एल. राहूलच्या 66 चेंडूंत 76 धावा (4 चौकार, 5 षटकार) उल्लेखनीय ठरल्या. भारताने पहिल्याच सामन्यात पराभूत झालेला संघ या सामन्यातही खेळवल्याची किंमत संघाला चुकवावी लागली. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने 3 तर जोश हेझलवुड आणि ऍडस्म झम्पा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. भारताचा डाव 9 बाद 338 वर रोखला गेला.
त्याआधी, नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना यजमान ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकांत 4 बाद 389 धावांचा डोंगर उभा केला. त्यामध्ये सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (83 धावा, 77 चेंडू, 7 चौकार, 3 षटकार) आणि कर्णधार ऍरॉन फिन्च (60 धावा, 69 चेंडू, 6 चौकार एक षटकार) यांनी पुन्हा एकदा शतकी सलामी देत 142 भागिदारी रचली. त्यावेळीच ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा 300 धावांच्या पार जाणार हे स्पष्ट झाले होते. फिन्चला मोहम्मद शामीने कोहलीकरवी झेलबाद केले, तर वॉर्नर चोरटी धाव घेताना धावबाद झाला.
त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्कस लाबुशेन यांची जोडी जमली. या दोघांनी 95 चेंडूत 136 धावांची भागिदारी केली. स्मिथने 64 चेंडूंत शतक (104) झळकावताना 14 चौकार आणि 2 षटकार लगावले. तर लाबुशेनने 61 चेंडूंत 70 धावा करताना 5 चौकार लगावले. स्मिथला हार्दीक पंड्याने मोहम्मद शामीकरवी झेलबाद केले, तर जसप्रित बुमराहच्या गोलंदाजीवर लाबुशेनचा झेल मयंक आगरवालने घेतला. शेवटी धडाकेबाज ग्लेन मॅक्सवेलने 29 चेंडूंत 63 धावा ठोकताना चार चौकार आणि तितकेच षटकारही लगावले.
भारताने फलंदाजांना वेसण घालण्यासाठी अनेक प्रकारे गोलंदाजीत बदल केले; शिवाय तब्बल 7 गोलंदाज वापरले. तरिही ते ऑस्ट्रेलियाचा झंझावात रोखता आला नाही.