श्रीनगर – जम्मू काश्मीरमध्ये सध्या सुरू असलेल्या जिल्हा विकास परिषदांच्या निवडणूकीसाठी भाजपने आज आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला. विशेष म्हणजे भाजपने प्रसिद्ध केलेला हा जाहिरनामा उर्दूमध्ये आहे.
जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या राज्यघटनेतील 370 व्या कलमातील आणि 35 ए कलमातील तरतूदी रद्द करून भाजपने देशाला एकसंध बनवले आहे. जम्मू काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीसह प्रमुख राजकीय पक्षांचा सहभाग असलेली “पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लरेशन’ केवळ मतांच्या राजकारणासाठी देशहिताविरोधात सक्रिय होती, असा आरोपही भाजपच्या जाहिरनाम्यामध्ये केला गेला आहे.
फेररचनेनंतर जम्मू काश्मीर पुन्हा विकासाच्या आणि शांततेच्या मार्गावर आहे. जम्मू काश्मीरमधील दगडफेक आता थांबली आहे आणि दहशतवादी कारवाया कठोरपणे निपटून काढल्या जात आहेत, असेही भाजपने म्हटले आहे.
सरकारी नोकऱ्यांमधील 100 टक्के आरक्षणाचे खरे श्रेय राज्यातील औद्योगिकीकरण वाढवण्याच्या धोरणालाच आहे. भ्रष्टाचार, भूमाफियाविरोधात भाजपने युद्ध पुकारले असून वीज, पाणीपुरवठा आणि रस्त्यांचे नेटवर्कदेखील सुधारत असल्याचा दावाही या जाहिरनाम्यात केला गेला आहे.