चंदिगढ – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेले आवाहन फेटाळून लावत शेतकऱ्यांनी दिल्लीतील बुरारी मैदानावर जाण्यास ठामपणे नकार दिला. शेतकरी भर थंडीत दिल्लीच्या सीमांवर ठाण माडून आहेत. हजारो शेतकऱ्यांची निदर्शने सलग चौथ्या दिवशी सिंघू आणि टिकरी सीमेवर सलग चौथ्या दिवशी सुरूच आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमितशहा यांनी दिल्लीतील बुरारी येथील निरंकारी मैदानावर जाण्याचे आवाहन केले होते. शेतकरी मैदानात पोहोचताच केंद्र सरकार त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहे, असे ते म्हणाले होते.
भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष बुटासिंग बर्जगिल म्हणाले, दिल्लीच्या सीमेवरच ठाण मांडून बसण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आम्ही बुरारीला जाणार नाही. हा निर्णय अनेक संघटनांच्या प्रतिनिधींनी मिळून घेतला आहे. शेतकरी संघटनेचे नेते हरमितसिंग काडीयन यांनीही बुरारी क्रिडांगणावर जाण्यास नकार कळवला आहे. केंद्राने शेतकऱ्यांशी चर्चा करताना कोणत्याही पूर्व अटी लादू नयेत. कोणत्याही अटीशिवाय बैठक व्हावी, अशी आमची मागणी आहे. आम्ही चर्चेला तयार आहोत.
दरम्यान दिल्लीच्या सीमांवर सुरू असणाऱ्या निदर्शनांमध्ये लवकरच आणखी हजारो शेतकरी जमा होतील, असे शेतकऱ्यांच्या नेत्यांनी सांगितले.
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, राष्ट्रीय किसान महासंघ, भारतीय किसान संघाच्या विविध गटांनी चलो दिल्ली आंदोलनाची हाक दिली आहे. किमान आधारभूत किंमत आणि केंद्राने केलेले तीन वादग्रस्त कायदे मागे घेण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने तीन डिसेंबरला चर्चेच्या आणखी एका फेरी घेण्याची तयारी केंद्र सरकारने दाखवली आहे.