कर्णकर्कश आवाज : वाहतूक पोलिसांकडून 25 दिवसांत 906 जणांवर कारवाई
पिंपरी – मूळ सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजाचा सायलेन्सर लावणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले आहेत. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी 25 दिवसांत 906 बुलेटस्वारांवर कारवाई केली. तसेच त्यांना 9 लाख 29 हजार 800 रूपयांचा दंड केला.
भोसरी एमआयडीसी परिसरात रस्त्यावर केक कापण्याचा प्रकार उघडकीस आला. यामुळे संतापलेल्या पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सर्व पोलीस निरीक्षकांची वायरलेस वरूनच झाडाझडती घेतली होती. तसेच बुलेटचा सायलेन्सर बदलून मोठमोठ्याने आवाज करीत जाणाऱ्यांवर तसेच फॅन्सी नंबर प्लेट व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी 18 ऑक्टोबर 2020 पासून बुलेटचा सायलेन्सर बदलणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली.
आरटीओच्या परवानगीशिवाय वाहनात कोणताही बदल केल्यास त्या वाहनचालकाला एक हजार रुपये दंड केला जातो. तसेच फॅन्सी नंबर प्लेट, प्रखर दिवे किंवा प्रेशर हॉर्न बसवणाऱ्या वाहन चालकांवरही कारवाई केली जाते. पोलीस आयुक्तालयात वाहतूक पोलीस विभागाच्या 10 चौक्या आहेत. यातील पोलिसांनी 18 ऑक्टोबर पासून बुलेटचा मूळ सायलेन्सर बदलणाऱ्या 906 जणांवर कारवाई केली आहे. बुलेटस्वारांना नऊ लाख 29 हजार 800 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
वाहतूक पोलिसांनी झुगारला राजकीय दबाव
पोलीस आयुक्तांनी बेशिस्त बुलेट चालकांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना दिले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी अशा बुलेटस्वारांवर जोरदार कारवाई सुरू ठेवली आहे.
बेशिस्त वाहन चालकांमुळे अपघात होतात. तसेच बुलेटचे सायलेन्सर बदलल्याने ध्वनी प्रदूषणातही वाढ होते. तसेच इतर वाहन चालक व वृद्ध यांनाही आवाजाचा त्रास होतो. यापुढील काळात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवरील कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे.
– श्रीकांत डिसले, सहायक आयुक्त (वाहतूक)