महा विकासआघाडीच्या मंत्रिमंडळात समतोल राखण्यासाठी आमदार दत्तात्रय भरणे हेच पर्याय
सचिन खोत
पुणे – महाराष्ट्रात 17 टक्के मतदार संख्या आणि 69 विधानसभा मतदारसंघात परिणामकारक धनगर समाज ठरत आहे. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात धनगर समाजातील कोणाला लालदिव्याची गाडी मिळणार, याची उत्सुकता राज्याला लागून राहिली आहे. धनगर समाजाच्या चळवळीतून नेतृत्व निर्माण केलेले नेते सत्तेवरून पायउतार झाले आहेत. राज्यात महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली. त्यामुळे धनगर समाजातील कोणत्या नवीन चेहऱ्यास मंत्रिमंडळात संधी मिळणार, याची उत्सुकता आहे.
विधानसभा निवडणुकीत तीन पक्षांपैकी राष्ट्रवादीतून इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे विजयी झाले आहेत. त्यामुळे बारामती लोकसभेतील बेरेजेच्या राजकारणासाठी भरणे हे राष्ट्रवादीसमोर एकमेव पर्याय असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे इंदापूरला लालदिव्याची “आस’ लागून राहिली आहे.
गेल्या दहा वर्षांपासून धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी धनगर समाजातून चळवळी निर्माण झाल्या. त्यातून महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, उत्तमराव जानकर आदी नेतृत्व तयार झाले आहेत. तत्कालीन आघाडी सरकारच्या 15 वर्षांच्या कार्यकाळात धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे चळवळीतील नेत्यांच्या उठावातून 2014 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तत्कालीन प्रस्थापित नेत्यांना पराभवाचे हादरे बसले. त्याचा परिणाम परिवर्तनात झाला. महाराष्ट्रात धनगर समाजाचे प्राबल्य पाहता राज्याच्या एकूण मतदारांपैकी 17 टक्के मतदार हे धनगर समाजाचे आहेत. 69 विधानसभा मतदारसंघात सुमारे 80 ते 1 लाख 25 मतदारसंख्या आहे.
हे मतदारसंघ हे निकालावर परिणाम करतात. यावेळच्या निवडणुकीत भाजपला पराभवास सामोरे जावे लागले आहे. खानदेश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव आहेत. आता मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने राष्ट्रवादीतून आमदार भरणे यांचे नाव चर्चेत आले आहे. सत्ताधारी पक्षांमधून इंदापूरचे धनगर समाजाचे भरणे हे निवडून आले आहेत. त्यामुळे भरणे हे नाव या निवडणुकीनंतर चर्चेत आले आहे.
बारामती लोकसभेसाठी सोयीस्कर निर्णय?
बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची निर्णायक मते आहेत. बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यात धनगर समाजाचे प्राबल्य आहे. 59 वर्षांत (2014 चा अपवाद वगळता) धनगर समाजाने राष्ट्रवादी, कॉंग्रेसला साथ दिली आहे. 2014 मधील बारामती लोकसभा निवडणुकीत चळवळीतील नेते महादेव जानकर यांनी लक्षवेधी मते घेतली होती. हाच धागा पकडून विधानसभेला गोपीचंद पडळकर यांना बारामतीच्या आखाड्यात उतरविले होते.
2014 मधील लोकसभा निवडणुकीत दौंडमधील धनगर समाजाने जानकर यांच्या झोळीत मते टाकली होती. त्याचे दूरगामी परिणाम दौंडच्या विधानसभा निवडणुकीत झाला होता. त्यावेळी रासपचे राहुल कुल यांना धनगर समाजाने तारले होते. त्यामुळे शरद पवार, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे हे आमदार भरणेंच्या समावेशासाठी आग्रही राहतील, असा अंदाज आहे. आगामी बारामती लोकसभा निवडणुकीत विरोधी धार कमी करण्यासाठी आमदार भरणे यांचा पर्याय राष्ट्रवादीसमोर असू शकतो.
मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व देण्यासाठी…
मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होणार आहे. त्यासाठी समाजातील सर्व घटकांचा समावेश असतो. सत्तांतरानंतर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांची महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उदयास आली आहे. त्यात धनगर समाजाला मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व देण्यासाठी राष्ट्रवादी हा पत्ता आपल्याकडे राखून ठेवेल, असा सूर धनगर समाजातून उमटत आहे. शिवसेना आणि कॉंग्रेसमधील दुसऱ्या फळीतील धनगर समाजाचे राज्यव्यापी चर्चेत आणि परिचित नेतृत्व पुढे आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी भरणे यांचे नाणे खणखणीत वाजण्याची शक्यता आहे.