डासांची उत्पत्ती : आरोग्य विभागाकडून कागदोपत्री दिशाभूल
रेडा- गेल्या महिनाभरात झालेल्या परतीच्या पावसामुळे इंदापूर तालुक्यातील गावोगावी वाड्या-वस्त्यांवर पाण्याचे डबके साचले आहेत. सर्वच भागात पाणीच पाणी झाल्यामुळे डासांच्या संख्येत वाढ झाली आहे. परंतु आरोग्य विभागातून परिणामकारक धूळ फवारणी होत नसल्यामुळे केवळ डासांमुळे नागरिक त्रस्त आहेत. कित्येक गावांतील नागरिक दवाखान्यात उपचार घेत आहेत.
इंदापूर तालुक्यातील सातही जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये हीच स्थिती आहे. गावातील मोकळ्या जागेत, रस्त्यांवर, गल्लोगल्ली गवत वाढले आहे. पाण्याची डबकी साचली आहेत. बावडा, निमगाव केतकी, भिगवण, वालचंदनगर, काटी, निमसाखर भागात अनेक दिवसापासून गटारी स्वच्छ न केल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. हेच डास मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत बाधीकारक ठरले आहेत. त्यामुळे कित्येक नागरिकांना डेंग्यू, मलेरियासारखे साथीचे आजार जडले आहेत. वाड्या-वस्त्यांवर जनावरांची संख्या जास्त असल्यामुळे पाण्याची दलदल झाली आहे. उग्र वास व डासांची पैदास कारणीभूत ठरली आहे. त्यामुळे वाड्या-वस्त्या तापाने फणफणत आहेत.
इंदापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या माध्यमातून प्रभावीपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरून गावोगावी सूचना व आरोग्य विभागाच्या पथकाने तात्काळ भेटी देऊन मार्गदर्शन करण्याची गरज आहे. नीरा- भीमा सहकारी साखर कारखान्याच्या शहाजीनगर भागात डासांची पैदास वाढत आहे. याच ठिकाणी आरोग्य केंद्र असतानादेखील अधिकारी या भागात फिरकतच नसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. इंदापूर शहर स्वच्छता सर्वेक्षणांमध्ये देशात मानाचे स्थान पटकाविले आहे. मात्र, आंबेडकरनगर तसेच इतर प्रभागांमध्ये अनेकजण डेंग्यूला बळी पडले आहेत. याकडे आरोग्य विभागाने लक्ष न दिल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे.