मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून भाजप शिव सेनेत बराच काळ रस्सी खेच झाली. दोघांपैकी कुणीच मुखयमंत्रीपद सोडायला तयार नसल्याने अखेर त्यांच्यात काडीमोड झाला आहे. त्यामुळे शिवसेना एनडीए मधून बाहेर पडली असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. “एनडीए कुणाची जहागीरदारी नाही. शिवसेना ही एनडीएच्या संस्थापकांपैकी एक आहे”, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.
एका मराठी वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे. एनडीएमध्ये राहायचं की नाही, कुणी ठेवायचं की नाही हा निर्णय घेणारी यंत्रणा कुठली आहे? असा सवालही राऊत यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
राऊत यांनी पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर कमबॅक केलं आहे. अँजिओप्लास्टीनंतर संजय राऊत शनिवारी ‘सामना’च्या कार्यालयात रुजू झाले. यावेळी त्यांनी एका मराठी वाहिनीशी बातचीत केली. महाराष्ट्राच्या मनातली गोड बातमी मिळणार आहे. नवीन राजकीय मेन्यू आहे, त्यामुळे प्रक्रियेला थोडा वेळ लागतो आहे, पण बातमी मिळेल हे नक्की, असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
ज्यांनी मोदींना पेढेवाला म्हणून हिणवलं त्यांना मोदी समजलेत का ?
“मोदी समजून घ्यायला आम्हाला भाजपच्या नेत्यांची गरज नाही, आज जे नेते मोदींविषयी बोलत आहेत, ते अस्तित्वातही नव्हते तेव्हापासून शिवसेना आणि मोदींचे संबंध आहेत. मोदींना साताऱ्याचा पेढेवाला अशी पदवी देणारे नेते तुमच्या मांडीवर बसतात, त्यांना मोदी समजलेत का? मोदींवर प्रखर नाही तर अत्यंत खालच्या स्तरावर टीका करणारे हे तुमच्या पक्षात येऊन महत्त्वाची पदं भूषवतात. त्यांना मोदी कळलेत का? बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आम्ही सर्वांनी अडचणीच्या काळात मोदींची पाठराखण केली आणि कवचकुंडल म्हणून काम केलं आहे. तेव्हा सर्व शेपटा घालून पळून गेले होते”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.