त्रिनिदाद :- वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक तिसऱ्या सामन्यात भारताच्या जयदेव उनाडकटने तब्बल दहा वर्षांनंतर एकदिवसीय संघात पुनरागमन केले.
बदली कर्णधार हार्दिक पंड्याने या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला 10 वर्षांनंतर अंतिम संघात स्थान दिले.
भरात नसलेल्या उमरान मलिकच्या जागी उनाडकटला संधी मिळाली. उमरान पहिल्या दोन्ही एकदिवसीय सामन्यात साफ अपयशी ठरला होता. त्याला एकही बळी घेता आलेला नाही. त्याने 2 सामन्यात 6 षटके गोलंदाजी केली.
उनाडकट भारताकडून अखेरचा एकदिवसीय सामना 2013 साली वेस्ट इंडिजविरुद्धच खेळला होता. यानंतर तो एकदिवसीय संघात स्थान मिळवू शकलेला नव्हता. मात्र, या दरम्यान गेल्या दोन मोसमांपासून त्याने देशांतर्गत स्पर्धांमध्ये सरस कामगिरी करत भारतीय संघात पुनरागमन केले.
उनाडकटला आयपीएल स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत संघात स्थान मिळाले होते, मात्र, तो अंतिम संघात स्थान मिळवू शकला नव्हता.
उनाडकटने भारतासाठी 7 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8 बळी घेतले आहेत. त्याने 10 टी-20 सामने खेळताना 14 बळी मिळवले आहेत. तसेच 4 कसोटी सामन्यात 3 बळी घेतले आहेत. उनाडकटने प्रथम दर्जाच्या 103 सामन्यात 382 बळी मिळवले असून लीस्ट ए स्पर्धांच्या 116 सामन्यात 168 बळी घेतले आहेत.