बंगळुरु – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज तिसरी टी-२० सामन्याची लढत होणार आहे. मात्र, क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये सध्या निराशेच वातावरण आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार बंगळुरू आणि त्याच्या आसपासच्या परिसरात रविवारी सायंकाळी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यापूर्वी धर्मशाळा येथील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता, आणि आता या तिसऱ्या सामन्यावरही पावसाचे सावट आलेय. मोहालीच्या सामन्यात विराटने आक्रमक खेळी खेळली होती. उपकर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी मोहालीत कॅगिसो रबाडाच्या नेतृत्वाखालील वेगवान माऱ्याचा आत्मविश्वासाने सामना केला होता. पंत धावांसाठी झगडत असताना मधल्या फळीत श्रेयस अय्यरमुळे भारताची फलंदाजीची ताकद आता वाढली आहे. गोलंदाज दीपक चहर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनीही अप्रतिम गोलंदाजी केली आहे.आता हाच फॉर्म सगळ्यांना ठेवावा लागणार आहे.
या तिसऱ्या सामन्यात पाऊस पडला आणि सामना रद्द झाला, तरी भारताला काळजी करण्याचे काही कारण नाही. कारण सध्या भारतीय संघ मालिकेमध्ये १-० असा आघाडीवर आहे. त्यामुळे सामना रद्द झाला तर भारताचा मालिका विजय होऊ शकतो.