India’s third T20 match against South Africa today : भारत व यजमान दक्षिण आफ्रिका यांच्यात आज (गुरुवार,14 डिसेंबर) टी-20 मालिकेतील तिसरा व निर्णायक सामना येथे होत आहे. पहिला सामना पावसामुळे वाया गेल्यानंतर दुसरा सामना जिंकत यजमान संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना जिंकत मालिकेत बरोबरी करण्यासाठी भारतीय संघ सज्ज बनला आहे. मात्र, फलंदाज यशस्वी होत असताना गोलंदाजांचे अपयश जास्त अधोरेखित होत आहे. त्यामुळे या सामन्यात भारताच्या गोलंदाजांकडून सरस कामगिरीच्या मोठ्या अपेक्षा राहणार आहेत.
दुसऱ्या लढतीत कर्णधार सूर्यकुमार यादव व रिंकू सिंग यांनी अर्धशतके फटकावली. तिलक वर्मानेही पुरेशी साथ दिली मात्र, ज्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या ते शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा व जीतेश शर्मा हे साफ अपयशी ठरले. तरीही 7 बाद 180 असे माफक आव्हान भारताने उभे केले होते. पावसाच्या व्यत्ययामुळे दक्षिण आफ्रिकेला 15 षटकांत 152 धावा करायच्या होत्या. नेमके त्याचवेळी आपले गोलंदाज अपयशी ठरल्यामुळे हा सामना भारतीय संघाने गमावला.
IND vs SA 2nd T20 : दक्षिण आफ्रिकेचा भारतावर पाच गडी राखून विजय…
या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेने या मालिकेत 1-0 अशी अपराजित आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांनी तिसराही जिंकला तर ते मालिका जिंकतील. त्याचवेळी हा सामना जिंकत मालिकेत 1-1 अशी बरोबरी करण्यासाठी भारतीय संघाला अफलातून परंतू जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेचे मार्को जेन्सन, तबरेज शम्सी यांच्यासह अन्य गोलंदाजांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ती पाहता भारतीय फलंदाजांना अत्यंत सावधपणे फलंदाजी करावी लागणार आहे. त्यांचा कर्णधार एडन मार्करमसह हेनरीच क्लासेन, रीझा हेण्ड्रीक्ससह अन्य फलंदाजांना रोखण्याचे आव्हान भारताच्या गोलंदाजांसमोर राहणार आहे.
तिलकला अखेरची संधी
भारतीय संघाचा नवोदित फलंदाज तिलक वर्मा गेल्या दोन महिन्यांपासून भारतीय संघातून खेळत आहे. त्याने यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरीमुळे भारतीय संघात स्थान मिळवले मात्र, एखादा सामन्याचा अपवाद वगळता त्याला फारशी टमक दाखवता आलेली नाही त्यामुळे या सामन्यात त्याला अखेरची संधी मिळण्याची शक्यता असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष राहणार आहे.