विशाखापट्टणम – दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. मोहम्मद शमी, रविंद्र जाडेजा यांनी दिग्गज फलदाजांना लवकरच माघारी पाठवले. त्यांच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ टिकू शकला नाही.
भारताने दुसऱ्या डावात आफ्रिकेला विजयासाठी ३९५ धावांचे आव्हान दिले होते. भारतीय गोलंदाजांनी एकाही आफ्रिकन फलंदाजाला खेळपट्टीवर स्थिरावण्याचा वेळच दिला नाही. भारताकडून मोहम्मद शमीने ५, रविंद्र जाडेजाने ४ तर आश्विनने १ बळी घेतला. आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात १९१ धावांपर्यंत मजल मारु शकला.
दरम्यान, आजच्या अखेरच्या सत्रात आश्विनने डी-ब्रूनला बाद करत दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला. यानंतर क्विंटन डी-कॉक, मार्क्रम, फिलँडर, हे फलंदाजांना लवकर बाद करण्यात गोलंदाज यशस्वी ठरले. शमी आणि जाडेजाने आफ्रिकेच्या फलंदाजांना मैदानावर स्थिरावण्यास वेळच दिला नाही. भारताने पहिल्या डावात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊन 502 धावांचा भक्कम स्कोअर उभा केला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ 431 धावांवर गारद झाला. त्यामुळे पहिल्या डावात भारताला 71 धावांची आघाडी मिळाली.
अखेरच्या दिवशी उपहारापर्यंतच्या सत्रानंतर आफ्रिकेचा संघ ८ गड्यांच्या मोबदल्यात ११७ धावांपर्यंत पोहचला होता. मात्र, मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर पिडीटच्या बॅटची कड घेऊन चेंडू स्टम्पवर जाऊन आदळला आणि आफ्रिकेची जमलेली जोडी फुटली. पिडीटने १०७ चेंडूत ५६ धावा केल्या. त्याच्या या खेळीत ९ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. यानंतर रबाडाला यष्टीरक्षक वृद्धीमान साहाच्या हातून झेलबाद करत शमीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.