IND vs ENG 3rd Test ( Team India scripts history with massive 434 run ) : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला. त्यामुळे टीम इंडियाकडे 126 धावांची आघाडी होती. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात चार विकेट गमावत 430 धावा केल्या आणि डाव घोषित केला.
इंग्लंडला विजयासाठी 557 धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात इंग्लिश डाव 122 धावांवर आटोपला. टीम इंडियाने इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केला आहे. टीम इंडियाने कसोटी इतिहासात धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय नोंदवला आहे तर धावांच्या बाबतीत इंग्लंडचा हा दुसरा सर्वात मोठा पराभव आहे. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सामनावीर ठरला.
तिसऱ्या कसोटीतील विजयासह पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. हैदराबादमधील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली, तर विशाखापट्टणममधील दुसरी कसोटी भारताने जिंकली. मालिकेतील चौथा सामना 23 फेब्रुवारीपासून रांची येथे खेळवला जाणार आहे.
इंग्लंड दुसऱ्या डावात 122 धावांवर गारद…
इंग्लंडची दुसऱ्या डावाची सुरुवात खूपच खराब झाली. 18 धावसंख्येवरच सलामीवीर बेन डकेटआणि जॅक क्रॉली पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतरही विकेट्स पडण्याची प्रक्रिया सुरूच होती. इंग्लंडचे 7 फलंदाज 50 धावांवर बाद झाले. भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लिश फलंदाज हतबल आणि असहाय्य दिसत होते. इंग्लंडच्या सहा फलंदाजांना दुसऱ्या डावात दुहेरी आकडाही गाठता आला नाही. मार्क वुडने सर्वाधिक 33 धावांचे योगदान दिले. याशिवाय जॅक क्रॉली (11), बेन डकेट (04) , ऑली पोप (03), जो रूट (07), जॉनी बेअरस्टो (04), बेन स्टोक्स (15) आणि बेन फॉक्स (16) या फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 122 धावांवर आटोपला.
भारताकडून दुसऱ्या डावात रवींद्र जडेजा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. रवींद्र जडेजाने 12.4 षटकात 41 धावा देत 5 फलंदाजांना आपले बळी बनवले. कुलदीप यादवला 2 यश मिळाले. याशिवाय रवी अश्विन आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 1 बळी घेतला. इंग्लडंचा एक फलंदाज धाववाद झाला.
रवींद्र जडेजा ठरला सामनावीर….
भारताच्या अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा तिसऱ्या कसोटी सामन्याचा सामनावीर ठरला. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. पहिल्या डावात 225 चेंडू खेळताना (9 चौकार आणि 1 षटकार) 112 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तसेच गोलंदाजीतही 10 षटकात 51 धावा देताना 2 गडी बाद केले. त्यानं कर्णधार बेन स्टोक्सला आणि टॉम हार्टले यांना बाद केलं. दुसऱ्या डावात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही पण त्यानं गोलंदाजीत चमक दाखवताना इंग्लंडची बेझबाॅल रणनिती फोल ठरवली. त्यानं दुसऱ्या डावात 12.4 षटकात 41 धावा देताना सर्वाधिक 5 गडी बाद केले. त्यानं आॅली पोप, जो रूट, जाॅनी बेअरस्टो, बेन फोक्स आणि मार्क वूड या फलंदाजांना बाद केले. अशाप्रकारे त्यांन सामन्यात एकूण 112 धावा आणि 7 विकेट घेताना महत्वूर्ण योगदान दिले.
भारताचा दुसरा डाव 430 वर घोषित
तत्पूर्वी, भारताने 4 बाद 430 धावा करून दुसरा डाव घोषित केला. यशस्वी जैस्वाल दुसऱ्या डावात 236 चेंडूत 14 चौकार आणि 12 षटकारांसह 214 धावांवर नाबाद राहिला. त्याचवेळी सर्फराजने 72 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 68 धावांची खेळी केली. दोघांमध्ये 158 चेंडूत 172 धावांची तुफानी भागीदारी झाली जी नाबाद होती. तत्पूर्वी आज चौथ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात शुभमन गिल 91 धावा करून बाद झाला तर कुलदीप यादव 27 धावा करून बाद झाला. तर, शनिवारी रोहित शर्मा 19 धावांवर आणि रजत पाटीदार खाते न उघडताच बाद झाला होता. इंग्लंडकडून रूट, हार्टले आणि रेहान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला…
राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात सर्वबाद 319 धावांवर आटोपला. बेन डकेटने संघासाठी 153 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. याशिवाय कर्णधार बेन स्टोक्सने 41 धावा केल्या.
भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. याशिवाय कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 यश मिळवले. तर अश्विन आणि बुमराहला 1-1 विकेट मिळाली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वर्चस्व गाजवणारा इंग्लंड तिसऱ्या दिवशी फ्लॉप दिसला आणि दुसऱ्या सत्रातच कोसळला. इंग्लिश संघाने शेवटच्या 5 विकेट अवघ्या 20 धावांत गमावल्या.
IND vs ENG 3rd Test Day 2 : रोहित-जडेजाचे शतक; टीम इंडियाचा पहिला डाव 445 धावांवर आटोपला..
भारताच्या पहिल्या डावात 445 धावा…
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय संघाचा पहिला डाव 445 धावांवर संपुष्टात आला. यामध्ये रोहितने कसोटी कारकिर्दीतील 11वे शतक झळकावले. रोहित शर्माच्या कर्णधारपदाचा डाव 131 धावांवर संपुष्टात आला. त्याने ही खेळी 196 चेंडूत 14 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने खेळली. रवींद्र जडेजानं 225 चेंडूत 112 धावांची खेळी खेळली. सर्फराजने 66 चेंडूंत नऊ चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 62 धावांची खेळी केली. ध्रुव जुरेलनं 46 तर रवी अश्विन 37 धावांची खेळी केली. जसप्रीत बुमराहने 26 धावांचे उपयुक्त योगदान दिले.
इंग्लंडच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर मार्क वुड हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मार्क वुडने टीम इंडियाच्या 4 फलंदाजांना आपले बळी बनवले. रेहान अहमदला 2 यश मिळाले. जिमी अँडरसन, टॉम हार्टले आणि जो रूट यांना प्रत्येकी 1-1 यश मिळाले.