मुंबई – अर्थव्यवस्था गलितगात्र झाली आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी पायाभूत सुविधा वाढविण्याच्या शक्यतेवर विचार करण्याची गरज असल्याचे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे.
सरकारने आणि खासगी क्षेत्राने पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी गुंतवणूक केल्यास या सुविधांच्या आधारावर आगामी काळात उद्योग-व्यवसाय वाढू शकतील, असे दास त्यांचे मत आहे. भारतीय उद्योग महासंघाच्या सदस्यांबरोबर चर्चा करताना दास म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत पायाभूत सुविधा विकसित करण्याची संधी सरकार आणि खासगी क्षेत्राला मिळाली आहे. भारत या क्षेत्रात पिछाडीवर आहे. या संधीचा उपयोग करून भारताने पायाभूत सुविधा विकसित देशाइतक्या आधुनिक केल्या तर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
रिझर्व्ह बॅंकेचे सर्व परिस्थितीकडे बारीक लक्ष आहे. त्या आधारावरच रिझर्व्ह बॅंकेने भांडवल सुलभतेसह काही सवलती दिल्या आहेत. आगामी काळातही ज्या क्षेत्रांना मदतीची गरज आहे, त्यांना मदत केली जाणार आहे. पायाभूत सुविधा वाढल्यानंतर पुरवठा साखळी कार्यक्षम होऊन विकास विकेंद्रित होण्यास मदत होईल. रुपयाचे मूल्य किती असावे यावर रिझर्व्ह बॅंकेने निर्णय घेतलेला नाही. मात्र, रुपया स्थिर ठेवण्याचा बॅंकेचा प्रयत्न यशस्वी झाला आहे.