करोना काळात जेव्हा देशव्यापी टाळेबंदी होती, तेव्हा ई कॉमर्स कंपन्यांवरही बंधने होती; परंतु टाळेबंदी सैल झाल्यावर या कंपन्यांनी कामकाज सुरू केले आणि त्यापैकी काही कंपन्यांनी पुन्हा एकदा किराणा वस्तूंची घरपोच सेवा सुरू केली. फ्लिपकार्ट, ऍमेझॉन, बिग बास्केट, ग्रोफर्स, झोमॅटो, स्विगी या कंपन्यांना सरकारने घरपोच सेवा देण्याकरिता मोकळीक दिली. पुरवठा साखळीच्या आणि डिलिव्हरीच्या अंतिम टप्प्यातील सुरक्षिततेसाठी सर्व आस्थापना आणि किराणा मालाची वाहने यांचे नियमित निर्जंतुकीकरण केले जाऊ लागले.
विक्रेत्यांनाही मास्क घालणे, सॅनिटायझर वापरणे सक्तीचे करण्यात आले. काही कंपन्यांनी डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हचा आरोग्यविमा किंवा जीवनविमा उतरवला होता. कर्मचारी विषाणू संसर्गाने बाधित झाला, तर त्याला आवश्यक ती आर्थिक-वैद्यकीय मदत दिली जाऊ लागली. किराणा क्षेत्रात लक्षणीय बदल होत आहेत. कोल्हापूरमधील छत्रपती शिवाजी मार्केट हे मसाले व मिरच्यांसाठी प्रसिद्ध आहे. तेथील एका दुकानात मसाले, मिरची पावडर, धान्य, कडधान्य आदींमध्ये एक खास ब्रॅंड नावारूपाला आणला गेला आणि त्याची विविध गावांत फ्रॅंचायसी देण्यात आली.
किराणा क्षेत्राचे आधुनिकीकरण व डिजिटायजेशन मोठ्या झपाट्याने होत आहे. कळकट्ट आणि बेंगरूळ दुकाने अस्तंगत होऊ लागली असून, छोटी दुकानेही झकपक केल्याविना त्यांचा धंदा होत नाही. मुंबईत अपना बाजार ही सहकारी क्षेत्रातील एक मोठी साखळी आहे आणि अनेक वर्षे मुख्यतः कामगारांना स्वस्तात दर्जेदार वस्तू उपलब्ध करून देण्याचे ते ठिकाण बनलेले आहे. सहकारी पातळीवर मुख्यतः कामगारांनीच सुरू केलेले हे भांडार कैक वर्षे यशस्वीपणे चालले असून, आता तर भोईवाड्यापासून अनेक ठिकाणची त्यांची भांडारे वातानुकूलित झाली असून, त्यांची मांडणीही आकर्षक असते.
असेच प्रयोग पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली अशा अनेक शहरांत बघायला मिळतात. या पार्श्वभूमीवर, मुंबईतील “झेप्टो’ या क्विक कॉमर्स स्टार्टअपने दहा कोटी डॉलर्सची भांडवल उभारणी केली आहे. दहा मिनिटांत किराणा माल घरपोच देणाऱ्या या कंपनीचे मूल्यांकन 57 कोटी डॉलर्स असून, त्यामध्ये “वाय कोईमतूर्स’ या कंपनीने गुंतवणूक केली आहे. या कंपनीचा हा कंटिन्युटी फंड असून, ग्लेड ब्रुक, नेक्सस, ब्रेयर कॅपिटल, लॅशी ग्रूम, ग्लोबल फाउंडर्स कॅपिटल आणि कॉंटररी कॅपिटल हे या झेप्टोमधील अन्य गुंतवणूकदार आहेत. विशेष म्हणजे, नोव्हेंबरातच कंपनीने सहा कोटी डॉलर्सच्या भांडवलाची उभारणी केली होती.
फ्लिपकार्ट, उबर, ड्रीम अकरा, फार्म इझी, पेपर फ्राय, ऍमेझॉन आदी कंपन्यांतील अधिकाऱ्यांनी मिळून झेप्टोचे नेतृत्व सांभाळले आहे. किराणा क्षेत्रातील कंपन्या ऑनलाइन पद्धतीने आपला व्यवसाय कसा विस्तारू शकतात, याचे हे एक उदाहरण असून, त्यामधून या क्षेत्रातील बदलाची दिशा अधोरेखित होते. नवीन भांडवलाचा उपयोग करून, झेप्टो देशातील विविध शहरांत पंख पसरणार आहे. पुरवठा साखळी, मार्केटिंग, वित्त, प्रॉडक्ट इंजिनियरिंग आणि मनुष्यबळ विकास या सर्व विभागांत त्यामुळे नवनवीन लोकांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. करोनामुळे पुरवठा साखळीत बाधा आली होती.
त्यामधून क्विक कॉमर्स किंवा क्यू कॉमर्स या क्षेत्राचा विकास होऊ लागला आहे. घराबाहेर पडून संसर्गाचा धोका पत्करण्याऐवजी दहा ते तीस मिनिटांत घरच्या घरी मालाची डिलिव्हरी मिळाली, तर ती कोणाला नको असते? आजकाल चिकन, मासे यापासून ते फळे, भाज्या व इतर जीवनावश्यक वा अन्य वस्तू झटपट घरपोच मागवता येऊ लागल्या आहेत. त्यासाठी अनेक शहरांत छोटी छोटी गोदामे उभारणे आवश्यक असते. ज्या वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात असेल, अशाच वस्तूंचा या गोदामात साठा केला जातो. अर्थात, सगळ्यांचेच सर्वच प्रयोग यशस्वी हेतात, असे नाही. झोमॅटोचे सहकार्य असलेल्या ग्रोफर्स या कंपनीने आपले नामांतर ब्लिंकिट असे केले आहे. मात्र, जेथे दहा मिनिटांत किराणा माल पाठवू शकत नाही,
अशा ठिकाणची सेवा तात्पुरती स्थगित केल्याची घोषणा कंपनीने केली आहे. कंपनीचे दैनंदिन दोन लाख ग्राहक असून, ही सेवा स्थगित केल्यामुळे 75 हजार ग्राहकांना याचा फटका बसू शकतो. याउलट स्विगीने याच महिन्यात 70 कोटी डॉलर्सची गुंतवणूक इन्स्टामार्ट या आपल्या क्यू कॉमर्स कंपनीत केली आहे. जानेवारी 2022 पर्यंत पंधरा मिनिटांच्या आत डिलिव्हरी देण्याची व्यवस्था तयार होईल. त्यासाठी ठिकठिकाणी “डार्क स्टोअर्स’ स्थापन केली जात आहेत, असे कंपनीने म्हटले आहे. “फ्राझो’ ही मुंबईची कंपनी ताजी फळे व भाज्या पुरवते. येत्या सहा महिन्यांत आपल्या डार्क स्टोअर्सच्या संख्येत तिप्पट वाढ करून, त्यांची संख्या 750 पर्यंत नेण्याची घोषणा तिने केली आहे.
टाटा समूहाच्या मालकीखाली आलेली बिग बास्केटची “बीबी नाउ’ तसेच “टाटा न्यू सुपर ऍप’, त्याचप्रमाणे “डन्झो’ या कंपन्याही या क्षेत्रात हातपाय पसरत आहेत. भारतातील ऑनलाइन ग्रोसरी बाजारपेठेचा आकार 2.9 अब्ज डॉलर्स इतका असून, त्यात दरवर्षी 37 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. ग्राहकांची जीवनशैली बदलली असून, शहरीकरण वाढत चालले आहे. फक्त शहरातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातील खासकरून तरुण-तरुणी तंत्रज्ञान प्रशिक्षित आहेत. त्यामुळे मोठमोठ्या पिशव्या घेऊन घासाघीस करत, गर्दीत भेलकांडत खरेदी करण्याऐवजी आणि त्यात वेळ व श्रम घालवण्याऐवजी, घरपोच माल आला तर बरे,
अशी मनोधारणा बनत चालली आहे. शिवाय लोकांना स्वच्छतेचे व आरोग्याचे वाढते भान येऊ लागले आहे. किरकोळ दुकानात किंवा भाजी मंडईत वजनमापात व गुणवत्तेबाबत फसवणूक होते, याचा सर्वांनाच अनुभव आलेला असतो. एकेकाळी वॉलमार्टसारख्या दुकानांना विरोध करणारे किरकोळ विक्रेतेही, काळानुसार आपल्याला बदलावे लागेल हे जाणून पावले टाकत आहेत. तेदेखील घरपोच सेवा वाढत्या प्रमाणात देऊ लागले आहेत. देशी-विदेशी गुंतवणूक, वाढती मागणी आणि स्पर्धा यामुळे रिटेल उद्योगाचा चेहरामोहरा आमूलाग्र बदलू लागला आहे, हेच खरे.