पळसदेव -उजनी धरणात सध्या मासा मिळेनासा झाला आहे .त्यामुळे उजनी काठावरील मासेमारी करणाऱ्यावर संक्रात आली आहे. पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातील मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मासेमारी सोडून दुसरा व्यवसाय करण्याची वेळ मच्छीमारांवर आली आहे. उजनी धरणात सध्या केवळ चिलापी मासे ते देखील थोड्या प्रमाणात मिळत आहे. तसेच परप्रांतीयांमुळे स्थानिकांच्या उपासमारीत भर पडली आहे.
सध्या कितीही जाळी टाकली तरी त्यात मासे सापडत नाहीत. वडाप ओढून सुद्धा समाधानकारक मासे सापडत नाहीत. अनेक जाळी अगदी मोकळीच निघत आहेत. त्यामुळे रोजीरोटी चालवण्यासाठी मासेमारी सोडून शेतमजूर म्हणून काम करण्याची वेळ आली आहे. इंदापूर तालुक्यातील मच्छीमार लोणी देवकर एमआयडीसीमध्ये रोजंदारीवर काम करीत आहेत.
उजनी काठावर अनेक दिवसापासून परप्रांतीय मच्छीमारांनी लहान लहान बीज पकडून नेल्याने उजनीत मासेच सापडत नसल्याचे चित्र आहे. सध्या लॉकडाऊन मुळे जे सापडत आहेत त्याला देखील भाव नाही, अशी बिकट स्थिती आहे. अगदी दहा रुपये ते चाळीस रुपयांपर्यंत माशाचा भाव घसरला आहे. त्यामुळे मच्छीमार सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे.
शासनाने त्यांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी मच्छीमार करीत आहेत. अनेक दिवसापासून बंदी असताना देखील परप्रांतीय मच्छीमारांनी लहान लहान मच्छ बीज पकडून नेत आहेत. सध्या देखील हा कारभार बिनभोभाट सुरु आहे. मार्केटमध्ये लहान मत्स्य बीज खरेदी विक्रीस बंदी आहे.
त्यामुळे हे मच्छीमार काही दलालांच्या मदतीने इतर ठिकाणी मत्स्यबीज वाळवून पोत्यात भरून विक्री करीत आहेत. लहान मासे पकडण्याचा प्रकार अनेक महिन्यापासून सुरु आहे. दरवर्षी उजनी व्यवस्थापन विभागाकडून उजनीत मत्स्यबीज सोडण्यात दिरंगाई, ठरलेल्या कोट्यापेक्षा कमी मस्त्यबीज सोडले जात असल्याने उजनीतील मासा कमी झाला आहे.
उजनी काठावरील अनेक गावात मोठी मांगूर माशाची तळी करून अनेक मच्छीमार आश्रयास आलेली आहेत. मांगूर पालनाबरोबर उजनीतील मस्त्यबीज मारण्याचा सपाटा नागरिकांनी लावला आहे. उपकार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या वतीने उजनी काठावरील सर्व आडते व व्यापाऱ्यांना लहान मासळी खरेदी करण्यासाठी बंदी घातली आहे. विक्री केल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा देखील दिला आहे. मात्र, परप्रांतीय मच्छीमार कोणाच्या आश्रयाखाली हा खुलेआम व्यवसाय करीत आहेत, असा सवाल इंदापूर तालुक्यातून उमटत आहे.
मासळीचे जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेत वाळवलेली मासळी विक्रीस पाठवत आहेत. त्यामुळे या मच्छीमारांवर अंकुश ठेवण्यास उजनी धरण व्यवस्थापन विभाग अपयशी ठरला आहे.