जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापण झाल्यापासून रोज नवनवीन चर्चा समोर येत आहेत. त्यातच आता राज्य सरकाच्या दोन मंत्र्यांनी आपल्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले. तसेच आपली सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी देखील केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली.
सरकार माजी मंत्र्यांना सुरक्षा पुरवते, मग आजी मंत्र्यांना आवश्यक सुरक्षा हवी, असे दोन्ही नेत्याचे म्हणणे आहे. दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतर आपल्या घराचीही रेकी करण्यात आली होती. मात्र भाजप सरकारने आवश्यक सुरक्षा पुरवली नव्हती. त्यामुळे आपल्या जिवाला धोका असल्याने सुरक्षा वाढवावी, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले.
तर गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा धोका पाहता, सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. दरम्यान, जितेंद्र आव्हाड आणि विजय वडेट्टीवार यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावध भूमिका घेतली आहे. पोलिसांच्या अहवालात काही आढळल्यास यासंदर्भात निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले.