कवडीपाट ते कासुर्डी फाटा येथे भीषण दुरवस्था : अपघातात अनेकजण जायबंदी
सोरतापवाडी – पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट ते कासुर्डी फाटा हा रस्ता “बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्वावर आयआरबी कंपनीला दिला. दि. 10 मार्च 2019 रोजी कवडीपाट टोलनाका व कासुर्डी टोलनाक्याची मुदत संपल्यावर बंद झाला. परंतु, रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. वाहनचालकांना त्रास होत आहे. रस्त्याच्यामध्ये असलेल्या दुभाजकाची उंची कमी असल्यामुळे अपघात होत आहेत. यात अनेक जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
या रस्त्यामुळे कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, नायगाव, पेठ, उरुळी कांचन गावांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे अनेक उद्योग धंदे गावात आले. मोठे बिल्डर, शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या. त्यामुळे वाहतुकीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. 15 वर्षे टोल वसुलीचे काम नियमानुसार सुरू होते. या टोलवसुलीची मुदत संपली आहे. त्यामुळे येथून वाहने विनाटोल ये-जा करीत आहेत. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केला आहे. यानंतर तो नॅशनल हायवेकडे सुपुर्द केला. परंतु, या विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.
19 जुलै रोजी कदमवाकवस्ती येथे यवत परिसरातील नऊ तरूणांचा बळी गेला. 29 सप्टेंबर रोजी लोणी काळभोर येथील राजेंद्र पंपासमोर एक कंटेनर दुभाजक तोडून दुसऱ्या कंटेनरला ठोकर दिली. 26 ऑक्टोंबर रोजी हिंदुस्थान पेट्रोलियम ट्रर्मिनलसमोर सिमेंटचा ट्रक दुभाजक तोडून दुसऱ्या ट्रकला धडकला. टोलनाका हस्तांतर करण्यापूर्वी रस्त्याची परिस्थिती चांगली होती.
देखभाल अभावी रस्त्याच्या कडेला कचरा साचलेला आहे. थोड्याशा पावसात रस्त्याच्या कडेला जागोजागी चिखल होत आहे. महामार्गावरील हायमॅक्स बंद पडले आहेत. लोखंडी जाळ्या तुटलेल्या व रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या महामार्गाची देखभाल केली तरच अपघाताला आळा बसणार आहे. मात्र, अधिकाऱ्यांची मानसिकताच लोप पावत आहे.