- रुग्णाच्या दुर्लक्षामुळे होताहेत गंभीर परिणाम
पिंपरी – लॉकडाऊन काळात उपचारांना झालेला विलंब आणि जीवनशैलीतील बदलामुळे नागरिकांमध्ये डोळ्यांच्या समस्या अधिक बळावू लागल्या आहेत. विशेषतः ज्येष्ठांमध्ये हे परिणाम अधिक जाणवत आहेत. 65 वर्षांवरील व्यक्ती करोनाच्या भीतीमुळे रुग्णालयात गेल्या नाहीत. परिणामी गेल्या काही महिन्यांत मोतिबिंदू पिकल्याच्या प्रकरणांमध्ये पाच पट वाढ झाल्याची माहिती शहरातील नेत्रतज्ज्ञांनी दिली आहे.
2019 च्या शेवटच्या तिमाहीमध्ये मोतिबिंदूची समस्या घेऊन येणाऱ्यांपैकी केवळ 10 टक्केव्यक्तींच्या डोळ्यातील मोतिबिंदू पिकलेला असायचा; मात्र 2020 या वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये या संख्येत 50 टक्के म्हणजे तब्बल पाच पट वाढ झाली. रुग्णालयात गेलो तर करोनाची लागण होईल, या भीतीने अनेक जणांनी तपासणीला जाणे टाळले. परिणामी मोतिबिंदू पिकल्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली. सध्या करोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत आहेत. वायसीएम किंवा औंध उरो रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांसोबत करोनाच्याही रुग्णांवर उपचार केले जातात. यामुळे करोना व्यतिरिक्त अन्य रुग्ण अशा रुग्णालयात जाण्यास टाळत आहेत.
“जवळपास गेले एक वर्ष रुग्ण घरी राहिल्याने या रुग्णांवर उपचार झाले नाही. परिणामी अनेकांचे मोतीबिंदू पिकले. करोनापूर्वीच्या ओपीडीत 250 रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात येत होती. परंतु आता रुग्णांची संख्या 400 वर गेली आहे. ज्या व्यक्तींना आधीपासूनच डोळ्यांच्या समस्या होत्या, त्यांनी साथीच्या कालावधीमध्ये दुर्लक्ष केले. ज्यांच्यात नव्याने या समस्या उद्भवल्या होत्या, त्यांनीही डॉक्टरला तात्काळ भेट देण्याऐवजी काही काळ प्रतीक्षा केली. परिणामी, गंभीर परिणाम झाल्याचे निदर्शनास येत आहे.
– डॉ. प्रकाश रोकडे, नेत्ररोग तज्ज्ञ
- काचबिंदूची समस्याही गंभीर
- “डोळ्याचे रुग्ण नियमितपणे भेट देत नसल्यामुळे काचबिंदूंची समस्या गंभीर झाल्याचे आढळून आले आहे. मधुमेह असलेल्या अनेक व्यक्तींनी डोळ्याच्या तपासण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे डोळ्यातील पडद्यामध्ये गुंतागुंत निर्माण झाली आहे.
- 50 वर्षांहून अधिक वय असलेल्या मधुमेहींनी वर्षातून किमान एकदा डोळ्यांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. कारण त्यांच्यापैकी 30 टक्के व्यक्तींना “डायबेटिक रेटिनोपॅथीसह मधुमेहाशी संबंधित कोणत्या ना कोणत्या प्रकारचा डोळ्यांचा आजार होण्याची शक्यता असते.
- “उपचाराला विलंब केल्यास गुंतागुंत निर्माण होऊ शकते. यात दृष्टी जाण्याचीही भीती असते. काचबिंदू झालेल्यांसाठीसुद्धा हे आवश्यक आहे. त्यांची स्थिती अस्थिर असेल किंवा डोळ्यांमध्ये वेदना होणे किंवा दृष्टीमध्ये बदल झाला असेल तर त्यांनी ताबडतोबड डॉक्टरांची भेट घेणे आवश्यक आहे.