नवी दिल्ली – कर रचना सुटसुटीत करण्याबरोबरच कर भरणा सोपा करण्यात आला आहे. अर्थव्यवस्था विस्तारत आहे. याची प्रतिबिंब प्राप्ति कर संकलनात पडत आहे. आतापर्यंत प्राप्तिकर विभागाने केलेल्या कर संकलनात 24% वाढ झाली असून या आर्थिक वर्षात आतापर्यंत 15.67 लाख कोटी रुपयांचे कर संकलन झाले असल्याची माहिती शनिवारी जारी करण्यात आली.
ढोबळकर संकलनानंतर करदात्यांना आवश्यक तो परतावा दिला जातो. परताव्यानंतर झालेले कर संकलन 18.40 टक्क्यांनी वाढून 12.98 लाख कोटी रुपये झाले आहे. सहा महिन्यानंतर आढावा घेतला असता कर संकलन वाढत होते. त्यामुळे अर्थसंकल्पात प्राप्तिकर संकलनाचे जे उद्दिष्ट ठरवले होते ते वाढविण्यात आले होते. वाढविण्यात आलेल्या उद्दिष्टाची पूर्ती होण्याची शक्यता असून आतापर्यंत वाढविलेल्या उद्दिष्टाच्या 79 टक्के इतके प्रत्यक्ष कर संकलन झाले आहे.
प्राप्तिकर संकलनाचे सुधारित उद्दिष्ट 16.50 लाख कोटी रुपये असून मूळ अर्थसंकल्पात ते 14.20 लाख कोटी रुपये ठरविण्यात आले होते. ही आकडेवारी 10 फेब्रुवारी पर्यंत जमा झालेल्या कर संकलनाची आहे. गेल्या वर्षी प्राप्तीकर संकलनातून 14.08 लाख कोटी रुपये जमा झाले होते. यावर्षी त्यामध्ये 17% भर पडेल असे अर्थसंकल्पात गृहीत धरण्यात आले होते.
प्रत्यक्ष करात वैयक्तिक प्राप्ती कराशिवाय कंपनी कराचा समावेश असतो. आतापर्यंत कंपनी करातून 20 टक्के जास्त तर प्राप्ती करातून 29 टक्के जास्त रक्कम जमा झाली आहे. या आर्थिक वर्षाच्या उरलेल्या काळातही प्राप्तिकार संकलन याच वेगाने वाढेल अशी आशा प्राप्ति कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. आता कसलेही निर्बंध राहिले नाहीत. अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्राचा विस्तार होत आहे. यावर्षी विकास दर मात्र सात टक्के पेक्षा जास्त राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील वर्षी हा विकास तर त्यापेक्षा कमी होऊन साडेसहा टक्के होणार आहे.