पिंपरी, (प्रतिनिधी) – क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले हे उत्तम लेखक, थोर समाजसुधारक, तत्वज्ञ आणि स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते. त्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. तसेच त्यांनी शेतकर्यांच्या, कामगारांच्या आणि महिलांच्या हक्कांचे समर्थन केले.
त्यांनी या देशासाठी, समाजासाठी केलेले कार्य महान असून त्यांच्या या कार्याचा जागर व्हावा यासाठी महापालिकेच्या वतीने क्रांतिसुर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्व 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रबोधन पर्वास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवांच्या विचारांचा जागर करावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले जयंतीनिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस तसेच पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकातील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास देखील अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदानात महानगरपालिकेच्या वतीने 11 ते 15 एप्रिल 2024 दरम्यान पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रबोधनपर्वाचे उद्घाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रबोधन पर्वाचे संयोजक तथा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उप आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता राजेंद्र जावळे, विनय ओहोळ, कनिष्ठ अभियंता प्रताप मोरे तसेच महापालिका कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन
शाहीर सुरेश सूर्यवंशी यांच्या गाथा महापुरुषांची या महामानवांच्या जीवनावर आधारित पोवाड्यांच्या कार्यक्रमाने गुरूवारी (दि.11) प्रबोधनपर्वाच्या पहिल्या दिवसाचा शुभारंभ झाला. सकाळी उषा कांबळे यांचा महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित एकपात्री नाट्यप्रयोग पार पडला.
तर दुपारी मधुकर कदम आणि त्यांच्या सहकार्यांनी पारंपारिक संगीत वाद्यातून महापुरुषांना अभिवादन केले आणि मतदान जनजागृती कार्यक्रम सादर केला.
त्यानंतर महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे महामानवांना अभिवादन करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संगीत विभागप्रमुख प्रा. डॉ. संजय मोहड यांचा क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले लिखित अखंडावर आधारित स्वर फुलोरा हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.
सायंकाळी धम्मा विंग्स, मुंबई प्रस्तुत जयभीम रॉक बॅण्ड या कार्यक्रमाद्वारे महापुरुषांना संगीतमय अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त गायक अमित जाधव यांच्या सूर क्रांतीचा, आवाज महापुरुषांचा या संगीत-नृत्य-नाट्य-गीतांच्या अविष्काराने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमांची सांगता झाली.