योजनेला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या सात राज्यांमध्ये अटल जल योजनेचा प्रारंभ केला. भुजलातील जल स्तर वाढवण्यासाठीची ही योजना आहे. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांच्या पर्यायाचा वापर केला पाहिजे. पाण्याचे काटेकोर नियोजन करून देशातील पाणी संचयासाठी शेतकऱ्यांनी हातभार लावावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मोदी म्हणाले की अटल जल योजनेमुळे देशातल्या 78 जिल्ह्यांमधील भुजलातील पाण्याचा खालावलेला स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महाराष्ट्र, हरियाना, राजस्तान, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि कर्नाटक या राज्यातील 8300 गावांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे. पंतप्रधान म्हणाले की देशात सध्या जमीनीतील पाण्याचा उपसा करून शेती केली जाते. त्यामुळे सिंचनाची ही जुनी पद्धत आता बदलण्याची गरज आहे. यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत असून भुगर्भातील जल स्तर खूप खाली चालला आहे. त्याचे मोठे दुष्परीणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. पावसाचे पाणी वाचवून सुक्ष्म सिंचनाकडे आपल्याला वाटचाल करावी लागेल असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले. त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची गरज असून ही माहिती त्यांना त्यांच्या भाषेत दिली गेली पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.
गावांनी आता उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी वॉटर ऍक्शन प्लॅन तयार केला पाहिजे, तसेच पाण्याच्या वापराच्या संबंधात स्वतंत्र जलनिधी तयार केला पाहिजे. सरकारने पाण्यासाठी एक जलजीवन मिशन हाती घेतले असून त्यात प्रत्येक घराला पाईपद्वारे पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच गावांमध्ये भुगर्भातील खोल गेलेल्या पाण्याचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला जाईल असे ते म्हणाले. ते म्हणाले की गेल्या 70 वर्षात देशातील केवळ 3 कोटी घरांना पाईपलाईनद्वारे पिण्याचे पाणी पुरवले गेले आहे पण आता आम्ही पुढील पाच वर्षात 15 कोटी घरांना नळाद्वारे पाण्याचा पुरवठा करण्याची योजना आखली आहे. पुढील पाच वर्षात पाणी योजनांवर केंद्र सरकार साडे तीन लाख कोटी रूपये खर्च करील अशी माहितीही त्यांनी दिली.