टी-20 सामन्यांत यजमानांचा पराभव : कोहलीच्या संघाने पराभवाचा वचपा काढला
सिडनी – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने सलग दोन विजयांसह मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. हा सामना भारत गमावणार असे वाटत असतानाच अखेरच्या दोन षटकांत हार्दिक पंड्याने केलेल्या वादळी फलंदाजीच्या जोरावर भारताने दिमाखदार विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेले 195 धावांचे आव्हान भाहतीय संघाने 19.4 षटकांतच सहा गडी राखून पार केले. अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी 14 धावांची गरज होती. पंड्याने दोन षटकार फटकावताना यजमान संघाला संधीच दिली नाही.
या विजयासह भारताने या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता येत्या मंगळवारी तिसरा व अखेरचा सामना होणार असून त्यातही विजय मिळवत यजमानांना त्यांच्याच भूमीत व्हाइटवॉश देण्याची संधी भारताला मिळाली आहे.
विजयासाठी आवश्यक धावांचा पाठलाग करताना सलामीवीर शिखर धवन व लोकेश राहुल यांनी 56 धावांची सलामी दिली. स्थिरावलेला असताना राहुल अनावश्यक फटका मारून बाद झाला. त्याने 30 धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीने धवनसह संयमी फलंदाजी करत संघाचे शतक फलकावर लावले.
दरम्यान, अर्धशतक पूर्ण केल्यानंतर धवनही बाद झाला. त्याने 36 चेंडूत 4 चौकार व 2 षटकार फटकावताना 52 धावा केल्या. त्यानंतर संजू सॅमसनने 10 चेंडूत 15 धावा करत अपेक्षा वाढवली होती. मात्र, तो देखील या संधीचे सोने करण्यात अपयशी ठरला.
कोहलीनेही धावांचा वेग वाढवताना अनावश्यकपणे बाहेरच्या चेंडूला फटकावण्याच्या प्रयत्नात आपली विकेट बहाल केली. तो 24 चेंडूत 2 चौकार व 2 षटकार मारून 40 धावांवर परतला. त्यावेळी धावा आणि चेंडू यांचे प्रमाण व्यस्त बनले होते. मात्र, हे अवघड गणित पंड्याने लिलया सोडवले. त्याने श्रेयस अय्यरला साथीला घेत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर आक्रमण केले. आक्रमकता हेच बचावाचे योग्य धोरण असल्याचे सिद्ध करताना त्याने चौफेर टोलेबाजी केली. यावेळी अय्यरही केवळ प्रेक्षकाच्याच भूमिकेत होता.
पंड्याने 22 चंडूत 3 चौकार व 2 षटकारांची बरसात करताना नाबाद 42 धावांची खेळी केली. त्याला सुरेख साथ देताना अय्यरने 5 चेंडूत 1 चौकार व 1 षटकार फटकावताना नाबाद 12 धावा केल्या. अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर पंड्याने षटकार खेचत संघाचा सामन्यातील व मालिकेतील विजय साकार केला.
धवनची अनोखी कामगिरी
शिखर धवन आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या डावखुऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. त्याने सुरेश रैनाचा 1605 धावांचा विक्रम मागे टाकत ही कामगिरी आपल्या नावावर नोंदवली. रैनासह युवराजसिंग व गौतम गंभीर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले आहेत. त्यामुळे धवनचा हा विक्रम पुढील काही काळ अबाधित राहणार आहे.
त्यापूर्वी, भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून यजमान ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरन फिंचला दुखापत झाल्याने तो या सामन्यात खेळू शकला नाही. त्याच्या जागी मॅथ्यू वेडने संघाचे नेतृत्व केले. वेडने डार्सी शॉर्टच्या साथीत 47 धावांची सलामी दिली.
मात्र, त्यानंतर वेडने आक्रमक फलंदाजी केली. त्याने 32 चेंडूत 10 चौकार व 1 षटकार फटकावताना 58 धावांची खेळी केली. त्याचवेळी वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर त्याचा उडालेला झेल कोहलीला घेता आला नाही, पण वेड आणखी एक धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. त्याच्या जागी आलेल्या मॅक्सवेलने आक्रमक फलंदाजी केली. मात्र, मोठी खेळी करण्यात तो देखील अपयशी ठरला.
स्टिव्ह स्मिथनेही धावांचा वेग वाढवला. मात्र, 38 चंडूत 3 चौकार व 2 षटकार फटकावून तो 46 धावांवर बाद झाला. त्यानंतर मोझेस हेन्रीक्स, मार्कस स्टोनिस व डॅनियल साम्सने आक्रमक फलंदाजी करत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली.
भारतीय संघाकडून टी. नटराजनने 2 गडी बाद केले. तर, यजुवेंद्र चहल व शार्दुल ठाकूरने प्रत्येकी 1 गडी
बाद केला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया – 20 षटकांत 5 बाद 194 धावा. (मॅथ्यू वेड 58, स्टिव्ह स्मिथ 46, मोझेस हेन्रीक्स 26, ग्लेन मॅक्सवेल 22, मार्कस स्टोनिस नाबाद 16, डॅनियल साम्स नाबाद 8, टी. नटराजन 2-20, शार्दुल ठाकूर 1-39, यजुवेंद्र चहल 1-51). भारत – 19.4 षटकांत 4 बाद 195 धावा. (शिखर धवन 52, विराट कोहली 40, लोकेश राहुल 30, हार्दिक पंड्या नाबाद 42, श्रेयस अय्यर नाबाद 12, मिचेल स्वेपसन 1-25, ऍडम झम्पा 1-36).