-अमित डोंगरे
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पराभवानंतर कर्णधार विराट कोहली व एकूणच संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्या टीकेला पूर्णविराम देताना कोहली आणि कंपनीने तीन टी-20 सामन्यांची मालिका जिंकताना यजमानांना त्यांच्याच देशात पराभूत केले. आता या मालिकेतील तिसरा सामनाही जिंकून व्हाइटवॉश देण्याची संधीही भारताने सोडता कामा नये.
या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाली तेव्हापासूनच निवड समिती टीकेची धनी बनलेली आहे. याला का घेतले त्याला का काढले, हे असले प्रश्नही अनेकांनी विचारले. त्यावेळी कर्णधार कोहलीने एकदाही प्रतिक्रिया दिली नाही. महेंद्रसिंग धोनीकडून शांत स्वभाव घेतल्यासारखा तो शांत राहिला. एकदिवसीय मालिका गमावल्यावर तर टीकेला चांगलीच धार आली. मात्र, तरीही त्याने आवाक्षरही काढले नाही. कदाचीत सचिन तेंडुलकरप्रमाणे आपल्या कामगिरीनेच उत्तर देण्याचा वारसाही त्याने घेतला असावा.
वैयक्तिक कोमगिरी फारशी चांगली होत नसतानाही त्याने संघातील खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देत सरस खेळ करण्याचा प्रयत्न केला. त्याचा हाच विश्वास शिखर धवन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर, यजुवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर व टी. नटराजन यांनी सार्थ ठरवला. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत जे गमावले त्याच्या दुप्पट टी-20 सामन्यांच्या मालिकेत कमावले असेच म्हणावे लागेल. या मालिकेने भारतीय संघाला नवी ओळख दिली. परदेशात सर्वाधिक टी-20 सामने जिंकण्याची कामगिरी भारतीय संघाने केली.
या मालिका विजयात खरे तर सर्वात जास्त योगदान हार्दिक पंड्याचे आहे हे देखील मान्य करायला हवे. हा माणूस डोके शांत ठेवून मैदानात वादळ निर्माण करतो. त्याची देहबोली पाहिली तर तो काही धावा करेल असेही वाटत नाही, पण खेळपट्टीवर आला की, आपले राज्य निर्माण करतो. पहिल्या सामन्यात जडेजाला हाताशी घेत त्याने संघाला वर्चस्व मिळवून दिले.
रविवारच्या सामन्यात जडेजा संघात नसताना त्याने श्रेयस अय्यरला बरोबर घेत विजय साकार केला. त्याची फलंदाजी पाहिली की वेस्ट इंडिजच्या बेदरकार वृत्तीची अनुभूती येते. एकमद कोणाशी तुलना करण्याचा हेतू नाही पण सर व्हिवीयन रिचर्डस् व डेस्मंड हेन्स यांची आठवण यावी, अशी आक्रमक फलंदाजी पंड्या करत आहे.
त्याला कोणते मैदान, कसे वारावरण किंवा कोणत्या दर्जाची गोलंदाजी याने काहीही फरक पडत नाही. तो खेळपट्टीवर आला की त्याचा नैसर्गिक खेळ करतो. या सामन्यातही त्याने तेच केले. अय्यरसह ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा पालापाचोळा करताना त्याने जी लढाऊ वृत्ती दाखवली त्याच्याच जोरावर कोहली कर्णधार म्हणून भाव खात आहे हे वेगळे सांगायला नको.
व्यावसायिक किंवा नैसर्गिक क्रिकेटपटू कसा असतो हे पंड्याकडे पाहिले की लक्षात येते. शिखर धवन व कोहलीच्या खेळीनंतरही हा सामना आपण गमावणार अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, पंड्याने हे चित्रच पालटून टाकले व कांगारूंची अत्यंत सहज शिकार केली. आता यजमान संघाला व्हाइटवॉश देण्याची संधी मिळाली आहे व कोहलीच्या संघाने ही संधी सोडू नये हीच अपेक्षा आहे.