जकार्ता – आशिया करंडक हॉकी स्पर्धेत दुसऱ्या साखळी सामन्यात भारतीय संघाला जपानकडून 5-2 असा मोठा पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला एक गोलच्या आघाडीनंतरही परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी दिसलेला कमकुवत बचाव जपानविरुद्धच्या सामन्यातही दिसला.
यामुळे या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला इंडोनेशियाविरुद्ध मोठा विजय मिळवावा लागणार आहे. तसेच अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे.
मंगळवारी झालेल्या अ गटातील साखळी सामन्यात जपानच्या कोसेइ कवाबेने 40 व 56 व्या मिनिटाला गोल केले, तर केन नागायोशी 24 व्या मिनिटाला, उका रयोमाने 49 व्या मिनिटाला तर कोजी यामासाकी 55 व्या मिनिटाला मिनिटाला गोल केला.
भारताकडून पवन राजभर 45 व्या मिनिटाला उत्तम सिंग 50 व्या मिनिटाला गोल केले. मात्र, भारतीय संघाचा बचाव अत्यंत सुमार झाला व त्याचाच लाभ जपानने घेतला.