नवी दिल्ली – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब आणि जगभरातील शीख समुदायाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप आज कॉंग्रेसकडून करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “अपने सीएम चन्नी साहब से कहियेगा की मै बठिंडा हवाई अड्डेपर सुरक्षित जिंदा पहुंच गया’ या विधानावरून निर्माण झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. कॉंग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी याच विधानावरून आज पंतप्रधान मोदी यांचा खरपूस समाचार घेतला.
ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेलिकॉप्टरने फिरोजपूर येथील प्रचार सभेला जायचे होते. परंतु त्यांनी ऐनवेळी हेलिकॉप्टरऐवजी हायवेने जाण्याचा मार्ग निवडला. पंतप्रधानांच्या टुरमध्ये अंतिम निर्णय नेहमी एसपीजीकडून घेतला जातो. इंटेलिजंस आणि स्थानिक पोलिसांकडून एसपीजीला मदत केली जाते. ही बाब सर्वविदीत आहे.
तरीसुध्दा, प्रचारसभेला गर्दी जमली नाही म्हणून पंतप्रधान सुरक्षेचा मुद्या पुढे करून संपूर्ण पंजाब आणि जगभरातील शीख समुदायाला बदनाम केले जात आहे. आश्वासनानंतरही एमएसपीसाठी समिती नेमली गेली नाही म्हणून देशभरातील शेतकरी पंतप्रधानांवर नाराज आहे. जागोजागी आंदोलन सुरू आहे. पंजाबमध्ये सुध्दा आंदोलन सुरू आहे. अशात, हेलिकॉप्टरऐवजी हायवेचा मार्ग निवडणे समजण्यापलिकडचे आहे, असा टोमणा खेडा यांनी मारला.
मुळात, प्रचार सभेला गर्दी न जमल्यामुळे पंजाबला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे अशा शब्दात खेडा यांनी पंतप्रधानांवर शरसंधाण साधले आहे.
…हे हास्यास्पद
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणालाही न सांगता पाकिस्तानमध्ये जातात. तेथे त्यांना सुरक्षित वाटते. उत्तरप्रदेशमध्ये दोन-तीनवेळा लोकांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला होता. दिल्लीमध्ये ट्रफिक जाममध्ये अडकले तेव्हा सामान्य माणसासारखे वागतात. या ठिकाणी त्यांना जीवाची भीती वाटत नाही. परंतु, संपूर्ण देशाचे पोट भरणाऱ्या शेतकऱ्यांपासून पंतप्रधानांना जीवाची भीती वाटते? हे हास्यास्पद आहे, असे खेडा यावेळी म्हणाले.