लखनौ – उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या कारभाराची दोन केंद्रीय निरीक्षक पाठवून भाजपश्रेष्ठींकडून सध्या झाडाझडती घेतली जात आहे. पुढील वर्षी या महत्त्वाच्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत असून त्या पार्श्वभूमीवर योगी सरकारचे काम कसे सुरू आहे याची माहिती मंत्र्यांकडून घेतली जात आहे.
योगी सरकारला राज्यातील करोना स्थितीची हाताळणी नीटपणे करता आलेली नाही, असा सार्वत्रिक आरोप असून त्या अनुषंगाने ही दोन दिवसांची आढावा बैठक लखनौमध्ये सुरू आहे त्यासाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून बी. एल. संतोष आणि माजी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग यांना पाठवण्यात आले आहे. भाजपच्या केंद्रीय पातळीवरून चार वर्षात पहिल्यांदाच योगी सरकारच्या कामगिरीचे हे मूल्यमापन हाती घेण्यात आल्याने उत्तर प्रदेशात नेतृत्व बदलाच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत.
भाजपने मात्र नेतृत्व बदलाच्या चर्चा फेटाळून लावल्या असून राज्यात कोविड नियंत्रण कार्याचाच केवळ आढावा घेतला जात आहे, असे नमूद करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात करोना रुग्णांवर नीट उपचारच केले गेले नाहीत. त्यामुळे तेथे हजारो लोक मरण पावले आहेत. मात्र, खरी आकडेवारी सरकारने लपवून ठेवली. तथापि, गंगा नदीच्या पात्रांतून शेकडो मृतदेह वाहात आल्याच्या घटनांना आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीमाध्यमांनी खूप प्रसिद्धी दिल्याने योगी सरकारबरोबरच मोदी सरकारचीही जगभर नाचक्की झाल्याचे मानले जात आहे.
पक्षाच्याच अनेक नेत्यांनी प्रसारमाध्यमांपुढे योगी सरकारच्या कामाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याचीही गंभीर दखल केंद्रीय पातळीवरून घेण्यात आली आहे. हे सरकार आपल्या पक्षातल्या आमदारांच्याच तक्रारींकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप अनेक आमदारांनी केले आहेत.