मुंबई – बीसीसीआयने अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या प्रशासकीय वर्चस्वाच्या जोरावर आयसीसीलाही जेरीस आणले आहे. विश्वकरंडक स्पर्धा भारतातच व्हावी, यासाठी बीसीसीआयने आयसीसीला एक महिना थांबण्याची विनंती केली असून, तोपर्यंत भारताऐवजी अन्य पर्यायांचा शोध यजमानांनी थांबवावा, असेही सांगितले आहे.
आज जागतिक स्तरावर करोनाचा धोका कायम असला तरीही येत्या काळात त्याचा धोका ओसरेल व भारतातच ही स्पर्धा घेणे शक्य होईल, असे सांगत बीसीसीआयने आयसीसीचीच कोंडी केली आहे.करोनामुळे चार मे रोजी स्थगित करण्यात आलेल्या यंदाच्या आयपीएलमधील उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत अमिरातीत होणार आहेत.
यासाठी 25 दिवसांचा कालावधी बीसीसीआयने निश्चित केला आहे.
यानंतर टी-20 विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. पण करोनामुळे स्पर्धा अन्य ठिकाणी होण्याची शक्यता होती.यावर गांगुलीने आयसीसीलाच कोंडीत पकडले आहे. भारतात करोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे भारतात या स्पर्धेचे आयोजन करणे सुरक्षित असणार नाही, असे आयसीसीचे मत आहे.
ही स्पर्धा अमिरातीत आयोजित करावी, अशी तयारी त्यांच्याकडून सुरू होती. पण बीसीसीआयने ही योजना धुडकावून लावण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अमिरातीतील तीन मैदानांवर आयपीएलच्या 31 लढती होतील आणि त्यानंतर विश्वकरंडक स्पर्धेच्या 45 लढती त्याच मैदानावर खेळवणे कसे शक्य होईल. येथील खेळपट्टीची इतके सामने होण्याची क्षमताही राहणार नाही. तसेच आयपीएलच्या आधी पाकिस्तान सुपर लीगमधील 20 सामनेही येथे होणार आहेत. एकूण 51 लढतींनंतर विश्वकरंडक स्पर्धेतील सामने याच मैदानावर कसे खेळवता येतील, असा सवालही बीसीसीआयने केला आहे. अशा स्थितीत करोनाच्या धोक्याचा आढावा घेत टी-20 विश्वकरंडक स्पर्धा भारतातच आयोजित करणे योग्य ठरेल.
बीसीसीआयच्या बैठकीतदेखील हाच निर्णय झाला असून, मंगळवारी होत असलेल्या आयसीसीच्या बैठकीत वेळ मागून घ्यायचा यावरही एकमत झाले आहे. देशात करोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे बीसीसीआयला ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी वेळ मिळू शकतो, असे सांगत आयसीसीने एक महिना निर्णय जाहीर करू नये, अशी विनंतीही बीसीसीआयने केली आहे.