बॉलीवूड अभिनेत्री अमृता राव आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवत आहे. तिच्या मते, 2002मध्ये तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या तुलनेत कलाकारांच्या व्हिजिऍलिजीची संकल्पना सोशल मीडिया आणि टॅलेंट मॅनेजमेंट फर्ममुळे खूप बदलली आहे.
एका मुलाखतीत अमृता म्हणाली, “आजकाल आपण सोशल मीडिया आणि पीआर यंत्रणा पाहात आहोत. पण याआधी एखाद्या कलाकाराची लोकप्रियता आणि सेलिब्रिटीचा दर्जा हा अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या प्रतिभेवरून निश्चित होत होता.
जेव्हा मी इंडस्ट्रीत “इश्क विश्क’, “मस्ती’, “मैं हूं ना’ यासारखे चित्रपटांमधून काम केले तेव्हा चाहत्यांपर्यंत पोहोचले. विशेष म्हणजे, “मैं हूं ना’सारख्या चित्रपटात शाहरुख खान आणि सुष्मिता सेनसारख्या सुपरस्टार्स होते. आता सोशल मीडियामुळे सर्वांना लोकप्रियता मिळत आहे.
परंतु मला वाटते की, एखाद्या अभिनेत्यासाठी एखादे पात्र किंवा चित्रपटातून लोकप्रियता मिळविणे जास्त महत्त्वाचे आहे. सोशल मीडियावर लोकप्रियता मिळविणे काहीही चूक नसून तो एक मोठा बदल आहे. मी जेव्हा इंडस्ट्रीत प्रवेश केला तेव्हा प्रतिभा असणे महत्त्वाचे होते आणि आम्ही एक कलाकार म्हणून कौशल्य संपन्न होण्यासाठी काम करत होतो.
आता टॅलेंट मॅनेजमेंटसारख्या गोष्टीदेखील आहेत. एक प्रकारे हा एक चांगला सांस्कृतिक बदल आहे. ज्यामुळे कलाकारांना अधिक सुरक्षित वाटते, असे अमृता रावने सांगितले.