पुणे – नेमेचि येतो पावसाळा…या कविकल्पनेप्रमाणे “नेमेचि होते वाहतूक कोंडी’, असेच दृश्य पाहावे तिकडे सध्या आहे. पुण्याचे राजकीय कारभारी या प्रश्नी आवाज उठवण्यास तयार नाहीत. तर, वाहतूक पोलीस फक्त कागदोपत्री नियोजन करत असावेत, अशी शंका निर्माण झाली आहे. ऐन सण-उत्सव काळात जीवघेणी कोंडी होत असून, पोलीस मात्र गर्दीच्या वेळेतही पावत्या फाडण्याच्या ‘ड्युटी’वर आहेत.
शहरात सध्या गणेशोत्सवाचे जोरदार वातावरण आहे. पेठांसह उपनगरांतही ठिकठिकाणी मंडप, कमानी आणि व्यासपीठे उभारली जात आहेत. तर, दुसऱ्या बाजूला वाहनसंख्या पाहता उपलब्ध रस्ते कमी पडत असल्याचे दृश्य आहे. “उत्सव बिनधास्तपणे साजरा करा’ हा खुद्द मुख्यमंत्र्यांचा आदेश असल्याने मंडळेदेखील उत्साहात आहेत. पण, हे सर्व एकीकडे असताना सामान्य पुणेकर नागरिक मात्र वाहतूक कोंडीत पुरता गुदमरला आहे.
शहरातील कोणताही रस्ता घ्या, गल्ली घ्या किंवा उपनगरांतील मुख्य मार्ग घ्या. सकाळी आठ वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत सर्व मार्ग “जाम’ झाले आहेत. त्यात धायरी, कोंढवा, मुंढवा, वडगावशेरी अंतर्गत गल्ली, येरवडा, धानोरी, विश्रांतवाडीचा भाग मांजरी, हडपसर, उंड्री, हांडेवाडी, कात्रज, आंबेगाव, धनकवडी, नऱ्हे, वारजे, कर्वेनगर, कोथरूड अशा कोणत्याही भागात गेलो असता, “कोंडीतून सुटका नाही’ अशीच भीती सामान्य वाहनचालकांना वाटत आहे.
सुट्टीच्या दिवशी एखादे कुटुंब हौसेने चारचाकी वाहनाने फिरायले निघाले, तर त्याला मनस्ताप सहन करण्यापलीकडे काही मिळत नाही. दरम्यान, या सर्व स्थितीबाबत वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
वाहतूक नियंत्रणासाठी पुणेकरांच्या अपेक्षा
- वाहतूक नियमनाची जबाबदारी पोलीस अधिकाऱ्यांनी घ्यावी.
- राज्य राखीव पोलीस दल, ज्यादा कुमक, जवळील ठाण्यातील कर्मचारी, वॉर्डनची मदत घ्यावी.
- सर्व ट्रॅफिक सिग्नल तातडीने सुरू करावेत.
- सामाजिक संस्थांची मदत घ्यावी.
- वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जनजागृतीपर व्हिडिओ करावेत.
- विकासकामांसाठी होणारी खोदकामे थांबवावीत.
- जड वाहतुकीला शहर-उपनगरांत पूर्ण बंदी घालावी.
- कार्यालयीन धावपळ पाहता, कचरा संकलन ट्रकच्या वेळा बदलाव्यात.
कारभाऱ्यांनो, काहीतरी बोला!
निवडणुका आल्यावर पोटतिडकीने बोलणारे भावी नगरसेवक, गल्लोगल्लीचे दादा-भाऊ-आप्पा, माजी नगरसेवक सध्या नागरिकांच्या समस्येवर बोलताना दिसून येत नाहीत. कारण, वाहतूक कोंडी हा त्यांच्या “इंटरेस्ट’चा विषयच नाही. तर, आमदार मंडळी राज्याच्या सत्ताकारणात मग्न आहेत. पक्ष पदाधिकारी लोकसभा निवडणुकीच्या नियोजनात आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या प्रश्नावर पोलिसांना जाब विचारण्यास कोणीही तयार नाही.