लोणंद – लोणंद परिसरात गेल्या एक आठवड्यापासून उन्हाचा पारा रोजच वाढत आहे. रात्रीच्या वेळी देखील उकाडा वाढला आहे. दुपारी येथील तापमान सुमारे ३७- ३८ अंश सेल्सियसपर्यंत गेल्याने लोणंद बाजारपेठेत आणि परिसरात अघोषित संचारबंदीसारखी स्थिती निर्माण होत आहे.
उन्हाचा पारा वाढल्याने नागरिक रसवंतीगृह शीतपेयांच्या दुकानात गर्दी करून जीवाला गारवा मिळवण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत. येत्या काही दिवसांत तापमान ४० अंशावर जाण्याची शक्यता असल्याने उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक काळजी घेताना दिसत आहेत. ऊन्हाची तीव्रता चांगलीच वाढलेली असल्याने इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानातून पंखा, कुलर खरेदीसाठी लोकांचा कल दिसू लागला आहे. कुंभारवाड्यात गरिबांच्या फ्रिजला माठांनासुद्धा मागणी वाढत आहे. ती पुढे आणखीन वाढणार असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. रखरखत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी बाजारात विविध प्रकारच्या टोप्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
विविध प्रकारचे गॉगल, टोप्या खरेदीकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. शरीराला गारवा निर्माण करणाऱ्या कलिंगड, द्राक्ष, टरबूज, काकडी यासारख्या फळांना मागणी वाढली आहे. विविध प्रकारचे ज्यूस, ताक, लस्सी, आईसक्रीम, कुल्फी याबरोबरच नारळपाणी, लिंबू सरबत आदी नैसर्गिक थंड पेयांनी देखील मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर उसाचा रस घेण्याकरीता रसवंतीगृहे हाउसफुल होत आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच सूर्य आग ओकू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सतत वाढ पाहावयास मिळत असून दुपारी कोणीही बाहेर पडायला तयार नसल्याचे चित्र दिसत आहे.