मुंबई – ज्या कार्यक्रमाचा, संयोजकांच्या मते रिऍलिटी शोचा प्रत्येक सिझन वेगवेगळ्या कारणांनी वादाच्या केंद्रस्थानी असतो, त्या वादग्रस्त “बिग बॉस’ चा चौदावा सिझन आता चक्क मराठी भाषेविषयी काढलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे वादात सापडला आहे.
विख्यात पार्श्वगायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार या सिझनमध्ये सहभागी असून त्याने “मराठी भाषा ऐकली तरी चीड येते’ असे आक्षेपार्ह विधान केले आहे. अन्य स्पर्धक राहुल वैद्य आणि निक्की तांबोळी यांच्याशी बोलताना जान कुमारने हे शब्द वापरल्याने, या विधानांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप नोंदवला आहे.
हा भाग नुकताच कलर्स वाहिनीवर प्रसारित झाल्यानंतर जान कुमार सानूच्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनीदेखील बिग बॉस व्यवस्थापनानं आणि जान कुमार सानूनं महाराष्ट्र आणि मराठी जनतेची माफी मागितली पाहिजे; अन्यथा या मालिकेच्या पुढील भागांचे चित्रिकरण करु दिले जाणार नाही, अशी धमकी केली आहे. यासाठी प्रसंगी महाराष्ट्र सरकारमार्फत चित्रिकरणाची परवानगीच रद्द करण्याची मागणी करु, असेही बांदेकर म्हणाले.
काय म्हणाला जान कुमार?
समाज माध्यमांतून जान कुमार सानूचं वक्तव्य सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी त्याच्या वक्तव्याबाबत आक्षेप नोंदवत संताप व्यक्त केला आहे. जानकुमार सानू म्हणाला दुसरा स्पर्धक राहूलला म्हणाला होता की, माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते.
शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी जान सानूला बिग बॉसमधून वगळण्याची मागणी केली आहे. “बिग बॉस’ या मालिकेचे शूटिंग महाराष्ट्रात होते. या मालिकेचा टीआरपी मराठी लोकांमुळे वाढतो. त्याच महाराष्ट्राच्या मराठीचा अवमान जान कुमार सानूने केला हे कदापि खपवून घेणार नाही.
महाराष्ट्रात करियर घडवलेल्या गायक कुमार सानूचा मुलगा मराठीचा द्वेष व अनादर करत असेल तर हे सहन केले जाणार नाही. जान कुमार सानूनं अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आरडोओरडा करत मराठी भाषेचा अवमान केला आहे. त्याबाबत जर कलर्स वाहिनीनं मुजोर जान सानूची हकालपट्टी केली नाही तर सेटवर येऊन शिवसेना आपल्या पद्धतीनं आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी वाहिनीला दिला आहे.