संगमनेर – संगमनेर तालुक्यातील करोनाबाधिताचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर चोवीस तास उलटले नाही, तोच शहरातील कुरण रोड परिसरातील एक महिला आणि धांदरफळ बुद्रुक येथील सहा, अशा आणखी सात करोना रुग्णांची वाढ झाल्याने तालुक्यात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली नाही, तर संगमनेरचे मालेगाव व्हायला वेळ लागणार नाही, असा सूर जनतेतून उमटत आहे.
तालुक्यात करोनाबाधित रुग्ण आढळण्याचा वेग कमी झाला होता. यापूर्वी संगमनेरमध्ये आठ करोनाचे रुग्ण सापडले होते. ते सर्व उपचारानंतर बरे झाले. मात्र पुन्हा धांदरफळ बुद्रुक येथील एका करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्या संपर्कातील सहा जण करोनाबाधित झाले आहेत. तसेच संगमनेर शहरातील कुरण रोड परिसरातील एक महिलाही करोनाबाधित आढळली. त्यामुळे तालुक्यात एकूण नवीन सात करोनाबाधित रुग्ण नव्याने सापडल्याने तालुका पुन्हा हादरून गेला आहे. त्यामुळे या भागात 22 मे पर्यंत हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आला आहे.
संगमनेर शहरातील इस्लामपुरा, कुरण रोड, बिलालनगर, अपनानगर, पानसरे आखाडा, गुंजाळ आखाडा, पुनर्वसन कॉलनी, पावबाकी रस्ता, ज्ञानमाता विद्यालय परिसर, तसेच कुरण गाव आणि धांदरफळ बुद्रुक हे क्षेत्र हॉटस्पॉट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्राच्या मध्यबिंदू पासून जवळपास दोन किलोमीटरचा परिसर कोअर एरिया म्हणून घोषित केला आहे. या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री इत्यादी 9 मे पासून 22 मे पर्यंत सकाळी 6 वाजेपासून, तर रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहे.
नव्याने रुग्ण सापडल्याने त्यास नागरिक प्रशासनास जबाबदार धरत आहेत. ज्या प्रमाणे प्रत्येक निवडणुकीत 25 नागरिकांमागे एक व्यक्ती प्रचारासाठी देण्यात येतो, त्याप्रमाणे उपाययोजना केली असती, तर ही परिस्थिती ओढावली नसती. तसेच महसूलमंत्र्यांच्या मतदारसंघात प्रशासनाकडून आणि करोना यंत्रणेकडून हलगर्जीपणा होत असेल, तर इतरांबाबत न बोललेलेच बरे, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहेत. प्रशासनाने पूर्वीपेक्षाही कठोर पावले उचलण्याची गरज आहे. प्रशासनाने ढील दिल्यास संगमनेरचे मालेगाव व्हायला वेळ लागणार नाही, असा सूर नागरिकांतून व्यक्त होत आहे.