पाथर्डी -तालुक्यातील रांजणी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्याच्या गायीचा जागीच मृत्यू झाला असुन तिचे वासरू गंभीर जखमी आहे. याबाबत वनविभागाकडून उपाययोजना करण्यापेक्षा संबंधित शेतकऱ्याची मुस्कटदाबी केली जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
रांजणी शिवारात डोंगराच्या पायथ्याला गणेश साळुंके या शेतकऱ्याची शेती आहे. शुक्रवारी (दि.8) साळुंके आपली जनावरे टकमाळ डोंगर परिसरात चारण्यासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास टकमाळ डोंगर परिसरातून आलेल्या बिबट्याने अचानक गायीवर हल्ला केला. यामध्ये गाय जागीच ठार झाली आहे. गाईनंतर बिबट्याने तिच्या वासरावर हल्ला करुन त्यास गंभीर जखमी केले.
याबाबत साळुंके वनविभागाकडे तक्रार देण्यासाठी गेले असता वनविभागाकडून तुम्ही तिकडे गेलेच कशासाठी असा प्रतिप्रश्न करून शेतकऱ्याची मुस्कटदाबी केली. वनविभागाने एक दिवस उलटून गेला तरी कुठलीही उपाययोजना केलेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त न केल्यास वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते ऍड. रामदास भताने यांनी सांगितले.