श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील रामबन जिल्ह्यातील बटोटे भागात शनिवारी झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांचा लष्कराने खात्मा केला. तेथे अद्याप शोधमोहीम सुरू आहे अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली.
या भागातील घरांच्या आडोशाने या दहशतवाद्यांनी लष्कराच्या गस्ती पथकावर हल्ला चढवला. त्यावेळी तेथे चकमक उडाली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवण व्यवसाय करणाऱ्या विजय कुमार आणि त्यांच्या कुटुंबियांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले. मात्र नंतर कुमार वगळता अन्य जणांची सुटका केली. कुमार यांचीही सुटका केल्याची माहिती जम्मू पोलिसांनी ट्विटरवरून दिली.
लष्कराचे गस्ती पथक शनिवारी सकाळी जात असता अतिरेक्यांनी त्यांच्यावर तीन हातबॉम्ब फेकले. त्यानंतर अंधाधूंद गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तीन दहशतवादी मारले गेले.
या भागाची नाकाबंदी करण्यात आली असून महामार्ग आणि त्याला जोडणाऱ्या रस्यावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.